दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका
ठाकरेंच्या टीकेनंतर मुख्यमंत्री फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
भाजपला अमीबा म्हणणाऱ्या ठाकरेंवर फडणवीसांचा हल्लाबोल
राज्यातील दोन प्रमुख नेत्यांमध्ये टोकाचा सामना
Thackeray vs Fadnavis political clash : भाजप अमीबासारखी म्हणणाऱ्या शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे फ्रस्ट्रेट झाले आहेत, असा हल्लाबोल फडणवीसांनी केला. महाराष्ट्रातील दोन प्रमुख नेते एकमेकांना भिडल्यानं राजकारण तापलं आहे. फडणवीसांच्या या टीकेला आता ठाकरे गट किंवा स्वतः उद्धव ठाकरेंकडून काय प्रतिक्रिया येते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
शिवसेनेचा काल, गुरुवारी मुंबईत दसरा मेळावा झाला. या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसह इतर मुद्द्यांवरून महायुती सरकार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, भाजपसह पंतप्रधान मोदी, अमित शहा, तसेच इतर सत्ताधारी पक्षांवर जोरदार हल्ला चढवला. उद्धव ठाकरेंच्या विखारी टीकेला भाजप नेत्यांनी जहरी टीकेनं प्रत्युत्तर दिलं आहे. ठाकरेंनी भाजपची तुलना अमीबासोबत केली. त्यावरून भडका उडाला. भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर चहुबाजूने प्रतिहल्ला चढवला. उद्धव ठाकरे फ्रस्ट्रेट झाले आहेत, अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रहार केला.
भाजप म्हणजे अमीबा आहे. वेडावाकडा पसरतो. लागेल तिकडे युती करतो. पण एकपेशी म्हणजे मीच. शरीरात गेलं की पोट बिघडतं, तसं हे समाजात घुसले की शांती नाहिशी होते, असा तिखट वार उद्धव ठाकरे यांनी केला होता.
ठाकरेंनी भाजपवर गंभीर आरोप केले होते. भाजपचा सुशासनाशी काहीही संबंध नाही. केवळ निवडणुकांसाठी फायद्याचा विचार करतात. यावेळी त्यांनी मराठवाड्यातील पूरग्रस्त परिस्थितीचा मुद्दा उपस्थित करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर ५० हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी केली.
उद्धव ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. एखादी व्यक्ती निराश झाली तर, ते अद्वातद्वा बोलायला लागतात. पण सूज्ञ लोक त्याकडे जास्त लक्ष देत नाहीत. त्यांची मानसिकता समजून घ्यावी लागते, असं फडणवीस म्हणाले. काल त्यांनी जी टिप्पणी केली, त्यामुळे वास्तवात माझे १००० रुपये वाचले. मी म्हणालो होतो की, हजार रुपयाची पैज लावा, ते विकासाच्या मुद्द्यावर एक शब्द तरी बोलले तर मी हजार रुपये देईल. पण ते विकासावर एकही शब्द बोलले नाहीत, असंही फडणवीस म्हणाले.
मराठवाड्यातील शेतकऱ्यांना शक्य ती मदत करा, शिवसैनिकांना ठाकरेंचं आवाहन
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याच्या भाषणात मराठवाड्यातील पूरग्रस्त, नुकसानग्रस्त शेतकरी होता. शेतकऱ्यांच्या मदतीच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारवर टीकास्त्र डागलं. आजच्या घडीला मराठवाड्यातील शेतकऱ्यांची अवस्था खूप बिकट आहे. सरकारने त्यांना वाऱ्यावर सोडले आहे. मी येथील शिवसैनिकांना आवाहन करतो की मराठवाड्यातील शेतकऱ्यांना शक्य तितकी मदत करावी, असे ठाकरे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.