भरत मोहळकर, साम टीव्ही प्रतिनिधी
बारामतीसह राज्यात पराभव पदरी पडल्याने अजित पवार गटात अस्वस्थता पसरलीय. त्यातच अजित पवार गटाचे आमदार शरद पवार गटात परतणार असल्याचे दावे केले जात आहेत. हे दावे अजित पवार गटाने फेटाळले असले तरी चर्चा सुरुच आहेत. त्यामुळे अजितदादा आता काय करणार? यावरचा हा खास रिपोर्ट.
बारामतीच्या मैदानातच काका शरद पवारांनी पुतण्या अजित पवारांना धोबीपछाड दिलाय. एवढंच नाही तर शरद पवारांनी राज्यात लढवलेल्या 10 जागांपैकी 8 जागांवर विजय मिळवलाय. मात्र अजित पवार गटाला मिळालेल्या 4 जागांपैकी 1 जागेवर विजय मिळवता आलाय. त्यामुळेच शरद पवार हेच पुतण्यावर वरचढ ठरल्याचं दिसून आलंय. त्यामुळे अजितदादा आता काय करणार? हा प्रश्न निर्माण झालाय. अजित पवार गटाचा लोकसभेला पराभव झाला असला तरी हा पराभव नसून आपण कमी पडल्याचं सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलंय.
लोकसभेला भाजपची केंद्रात एकहाती सत्ता मिळवून दिल्यास अजित पवार यांना मुख्यमंत्रिपद देण्याचं आश्वासन दिल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. मात्र आजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांचाच पराभव झाल्याने अजित पवारांची मोठी पिछेहाट झालीय. त्यातच अजित पवार गटाच्या विजयाचा स्ट्राईक रेट अवघा 25 टक्के इतकाच आहे.
लोकसभेची कामगिरी घसरल्यानं अजित पवारांचं मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न भंगल्याचं म्हटलं जातंय. एवढंच नाही तर लोकसभेच्या पराभवानंतर अजित पवार गटाचे आमदार पुन्हा परतीच्या वाटेवर असल्याचा दावा शरद पवार गटाकडून करण्यात येतोय. त्यामुळे आता अजित पवार नेमकं काय करणार, ते पवारांसोबत पुन्हा येणार की महायुतीसोबत राहणार? असे अनेक सवाल यानिमित्तानं उपस्थित झाले आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.