राज्यभरात गाजत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात अनेक दिग्गज नेत्यांचे नाव समोर आले. मात्र यापैकी एक नाव जे केंद्रस्थानी राहिले ते म्हणजे रूपाली चाकणकर. या प्रकरणामुळे त्यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यासह राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाचा देखील पदभार सोडावा लागला. अशोक खरातसोबत चाकणकरांचे असंख्य फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात त्यांना पदावरून हटवण्याची मागणी जोर धरू लागली होती.
तर दुसरीकडे ईडी आणि आयकर विभागाने देखील खरातच्या मालमत्तेची चौकशी केली. विशेष म्हणजे कालच रूपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांची एसआयटीने तब्बल 10 तास चौकशी केली. मात्र आपल्या नावे बनावट खाते उघडण्यात आले असून बँकेच्या व्यवहाराशी आपला कुठलाही संबंध नसल्याचे त्यांनी म्हटले. त्यातच आता जवळपास 28 दिवसांनी रूपाली चाकणकरांनी खरातप्रकरणी होत असलेल्या आरोपांवर सोशल मीडियातून आपली बाजू मांडली.
रूपाली चाकणकर यांनी फेसबुक पोस्ट करत बीडमधून आलेल्या पत्राची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. कुठल्यातरी पुराव्याच्या आधारे कुणीतरी लिहिलेल्या पत्रावरून मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले अशी भावना त्यांनी सोशल मीडियातून व्यक्त केली.
महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात आजतागायत अनेकांवर आरोप झाले, त्या आरोपांचे पुरावे माध्यमांनी सबंध महाराष्ट्राला दाखवले आणि आरोप करणाऱ्यांनीही पुराव्यानिशी आरोप केले. मात्र आज 28 दिवस होत आहेत, माझ्यावर आणि माझ्या परिवारावर बेछूट तसेच कपोलकल्पित आरोप हे फक्त हेतूपुरस्सर व बदनाम करण्यासाठी होत आहेत, हे वेळोवेळी समोर येत आहे. याबाबतीत आरोप करणाऱ्यांनी ना पुरावे दिले ना प्रसार माध्यमांनी ते मागितले.
तसेच, निनावी पत्राबाबत जे कोणी आरोप करणारे आहेत त्यांनी सांगावे की ते पत्र त्यांच्यापर्यंत कसे आले? कोणतीही शहानिशा न करता केवळ आणि केवळ बदनामीचा कुटील डाव साध्य करण्यासाठी, पोलीस प्रशासनाला प्राप्त झालेलं एक निनावी पत्र माध्यमांकडे सुपूर्त करून दिवसभर चर्चासत्र घडवून आणले गेले ,हे घडवून आणण्यामागे कुणाचे “सौजन्य “होते हे समोर आले पाहिजे. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनीही ज्या पत्रावर नाव व पत्ता नाही अशा निनावी पत्राला कायदेशीरदृष्ट्या काहीही अर्थ नसल्याने महत्त्व देता येत नाही,हे माध्यमांसमोर येत स्पष्ट केले आहे . तरीही, खोडसाळपणा करण्यासाठी हे पत्र कोणी लिहिले,कोठून आले याची चौकशी झालीच पाहिजे.
यानिमित्ताने एक नवा चुकीचा पायंडा पाडला जात आहे. केवळ तर्कवितर्क,अंदाज, सुरस कथा आणि रंजक अफवा यांच्या आधारावर मला व माझ्या परिवाराला मानसिक त्रास दिला जातोय,बदनाम केले जात आहे,हे अत्यंत खेदजनक आहे.मी पहिल्या दिवसापासून माझी ठाम आणि स्पष्टपणाने भूमिका मांडत आले आहे.खरात प्रकरणात कोणत्याही आर्थिक व्यवहारात,जमीन व्यवहारात व इतर कोणत्याही दुष्कृत्यात दुरान्वये आमचा संबंध नाही.शेवटी सत्य प्रखरतेने समोर येईलच,हा माझा दृढ विश्वास आहे. . तरीही गेले काही दिवस प्रसारमाध्यमांमधून माझ्याविरोधी एकतर्फी येणाऱ्या बातम्या यावर मी प्रतिक्रिया किंवा कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही कारण SIT व चौकशी करत असलेल्या तपास यंत्रणेला निष्पक्षपणे चौकशी करता यावी हाच हेतू आहे. असे त्या म्हणाल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.