लोकसभा निवडणुकीतल्या यशामुळे महाविकास आघाडीला आता सत्तेची स्वप्नं पडू लागली आहेत. हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी मविआमधील तीनही पक्षांचं युद्धपातळीवर नियोजन सुरु झालं आहे. सर्वाधिक 13 जागा मिळाल्यानं काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला आहे. काँग्रेसच्या या यशामध्ये विदर्भाचा मोठा वाटा असून विदर्भात काँग्रेसला पाच जागा मिळाल्या आहेत.
भाजपला केवळ नऊ जागांवर समाधान मानावं लागलंय. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांनी कंबर कसली आहे. त्यामुळे राहुल गांधी विधानसभेच्या निवडणुकीत विशेष लक्ष घालणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे राहुल गांधी मिशन महाराष्ट्रवर असणार आहेत. ज्यांनी बोलवलं त्यांच्या मतदारसंघात राहुल गांधींची तोफ धडाडणार आहे.
केवळ राहुल गांधीच नव्हे तर प्रियंका गांधींच्याही सभा होणार आहेत. विशेष म्हणजे भाजपच्या बड्या नेत्यांविरोधात त्यांच्या मतदारसंघात सभा, रॅलीचं नियोजन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीकडून केलं जाणार आहे.
राहुल गांधींच्या 15 ते 20 सभांचं नियोजन आहे. प्रियांका गांधी यांच्याही वेगवेगळ्या जिल्ह्यात सुमारे 10 सभा होणार आहेत. अख्खा महाराष्ट्र पिंजून काढण्याचं नियोजन आहे. भाजपाच्या प्रमुख नेत्यांच्या मतदारसंघांना केंद्रस्थानी ठेवून राहुल गांधी यांच्या सभांचं नियोजन केलं जाणार आहे.
लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी संपूर्ण देशात झंझावाती दौरा केला होता. त्यांनी देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेत भाजप, पंतप्रधान नरेंद मोदी यांच्याविरोधात जोरदार आघाडी उघ़डली होती. त्याचाच परिणाम म्हणून भाजपच्या लोकसभा निवडणुकीतील जागा कमी झाल्या. त्यानंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होत आहे. या निवडणुकीतही राहुल गांधी महाराष्ट्रात सभा घेणार असल्यामुळे काँग्रेसचा जोश नक्कीच वाढणार आहे. मात्र याचा काँग्रेसला आणि मविआला किती फायदा होणार हे निकालांनंतरच कळेल.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.