सागर निकवाडे
नंदूरबार : मकर संक्रांतीच्या निमित्ताने नंदुरबार जिल्ह्यात साजऱ्या होणाऱ्या पतंगोत्सव दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हि परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यात पुढील पंधरा दिवस म्हणजे ७ जानेवारीपासून २१ जानेवारीपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी सदरचे आदेश काढले असून आजपासून याची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
मागील काही दिवसांत नंदुरबार जिल्ह्यातील जातीय संवेदनशीलता व अशांततेच्या घटना घडल्या होत्या. यात नंदुरबार शहरात सप्टेंबरमध्ये दोन गटांमध्ये दगडफेक होऊन दंगल घडली होती. यामुळे शहरात काही दिवस तणावाचे वातावरण राहिले होते. या घटनांचा विचार करता सण उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू नये, या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी काढलेल्या आदेशानुसार प्रतिबंधात्मक मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत.
मोर्चा, मिरवणुकीस मनाई
सदरच्या आदेशानुसार जिल्ह्यातील कोणालाही कोणत्याही प्रकारची हत्यारे, ज्वलनशिल किंवा स्फोटक पदार्थ बाळगण्यास मनाई राहील. तसेच सार्वजनिक ठिकाणी वादग्रस्त भाषणे, घोषणाबाजी, गाणी, वाद्ये वाजविणे किंवा शांतता भंग करणारे कृत्य करण्यास मनाई आहे. तर पाच किंवा अधिक लोकांच्या जमावास मनाई असून यासाठी स्थानिक पोलीस स्टेशनच्या पूर्व परवानगी घ्यावी लागणार आहे. तसेच विशेष परवानगीशिवाय सभा, मोर्च किंवा मिरवणूक काढण्यास मनाई राहील.
चार शहर संवेदनशील क्षेत्र घोषित
जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यासोबतच जिल्ह्यातील नंदुरबार शहरासह नवापूर, शहादा, अक्कलकुवा व तळोदा हि पाच शहरे संवेदनशिल क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत. याठिकाणी पुढील पंधरा दिवस प्रतिबंधात्मक आदेश लागू राहणार असून नागरिकांनी शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे; असे आवाहन प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.