सागर निकवाडे
नंदुरबार : राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर आता तीनही पक्षांतील नेत्यांमध्ये आपसी मतभेद असल्याचे बोलले जात आहे. याचा परिणाम स्थानिक पातळीवर अद्याप दिसून येत नसला तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत परिणाम दिसण्याची शक्यता आहे. दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात महायुतीतील भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी युतीमध्ये तणाव पाहण्यास मिळत आहे. यामुळे आगामी निवडणुकीत भाजपकडून एकला चलो रे ची भूमिका घेतली आहे.
नंदुरबारमध्ये भाजप आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी आगामी निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत युती न करण्याचा निर्णय जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीने भाजप विरोधात काम केल्याचा ठपका ठेवत गावित यांनी हे वक्तव्य केले आहे. यामुळे नंदुरबारमध्ये महायुतीत स्पष्ट संघर्ष निर्माण झाल्याचे पाहण्यास मिळत आहे.
शिवसेना- राष्ट्रवादीकडून विरोध झाल्याचा आरोप
दरम्यान भाजपचे आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी आरोप केला आहे की, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना युतीबाबत सूचना देऊनही नंदुरबारमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीने उघडपणे भाजपचा विरोध केला. यामुळे आगामी निवडणूक स्वतंत्र लढण्याची तयारी जाहीर केली असल्याने या अंतर्गत वादामुळे नंदुरबारमध्ये भाजप 'एकला चलो रे'च्या भूमिकेत आहे.
वरिष्ठ नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष
शिवसेना आणि राष्ट्रवादीने केलेल्या विरोधाला पाहता येणाऱ्या निवडणुकीत त्यांच्यासोबत युती करणे अशक्य असल्याचे गावित यांनी स्पष्ट केले आहे. डॉ. विजयकुमार गावित यांच्या यांनी केलेल्या वक्तव्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले असून यानंतर आगामी निवडणुकांमध्ये याचे पडसाद उमटण्याची शक्यता देखील वर्तविली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.