मान्सून (Monsoon 2024) दाखल झाल्यापासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे सामान्य नागरिकांसह बळीराजा देखील सुखावला आहे. शेतकऱ्यांनी शेती कामाला सुरूवात देखील केली आहे. अशामध्ये हवामान खात्याने पुढचे दोन दिवस राज्यासाठी महत्वाचे असल्याचे सांगितले आहे. राज्यात पुढच्या दोन दिवसांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन केले जात आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढच्या दोन दिवसांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात येत्या दोन दिवसांत मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या भागातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. आज मराठवाडा, मध्य महाराष्ट्राला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकणालाही मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
१७ आणि १८ जून रोजी कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील घाट माथ्यावर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या भागांना हवामान खात्याकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर १७ जून रोजी विदर्भातील सर्व जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भातील अनेक जिल्ह्यांना देखील हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे.
दरम्यान, यवतमाळ जिल्ह्याच्या वणी शहरासह परिसरात जोरदार पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. पावसाने हजेरी लावल्याने उकाड्यापासून त्रस्त असलेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. जोरदार पावसामुळे वणी परिसरातील शेतीच्या कामांना वेग आला आहे. तर
कोल्हापुरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागात पावसाचा जोर वाढला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.