महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार
मान्सूनपूर्व पावसाने पिकांना झोडपलं
मराठवाड्यासहित उत्तर महाराष्ट्रातही पावसाने उडवली दाणादाण
राज्यातील विविध जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. मान्सूनपूर्व पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांची उभी पिके आडवी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचा दावा करण्यात येत आहे. पुणे, नांदेड, अहिल्यानगर, परभणी जिल्ह्यात कोसळलेल्या पावसाने नागरिकांची एकच तारांबळ उडाल्याचे दिसून आले.
राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यात पाऊस कोसळला?
नांदेडमध्ये जोरदार पाऊस
नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील बारड परिसराला पावसाने झोडपलं आहे. दिवसभर कडक ऊन आणि सायंकाळच्या सुमारास वातावरणात बदल झाला आहे. सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळला. जवळपास तासभर पडलेल्या पावसामुळे बारड येथील आठवडी बाजारातील व्यापाऱ्यांची धावपळ उडाली. पावसामुळे उन्हापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला.
अहिल्यानगरमध्ये मान्सूनपूर्व पावसाची हजेरी
अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी फळबागांचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तर अचानक झालेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने उकाड्याने त्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय.
परभणीत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी
परभणी जिल्ह्यात आज दिवसभर कडाक्याचे ऊन आणि उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. मात्र सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला. त्यानंतर वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट पाऊस सुरू झाला. शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे शहरातील रस्त्यांवर धुळीचे लोट आणि कचरा उडाल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली. तर जोरदार पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले. या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
जालन्यात जोरदार पावसाची हजेरी
जालन्यातील घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव आणि परिसरात सायंकाळी अचानक हवामानात बदल झालाय. वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावलीय. दिवसभर प्रचंड उकाडा आणि वाढलेल्या तापमानामुळे हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची मोठी धावपळ उडाली.
नाशिकमध्ये शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान
नाशिकच्या येवला तालुका तालुक्यातील बोकटे शिवारात झालेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने बापूसाहेब सिताराम दाभाडे या शेतकऱ्याची दोन एकर केळीबाग अक्षरशः उध्वस्त झाली. या नैसर्गिक आपत्तीमुळे संबंधित शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. येवला परिसराची ओळख कांद्याचे आगार म्हणून आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून कांद्याला अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्याने मोठी आर्थिक गुंतवणूक करत दोन एकर क्षेत्रात केळी लागवड केली होती.
केळी पीक चांगल्या जोमात आले. मात्र वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने काही क्षणांतच संपूर्ण पीक उद्ध्वस्त केले. जोरदार वाऱ्यामुळे केळीची झाडे मुळासकट कोसळली. तसेच अनेक घडांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.