फाटाफूट झालेल्या राष्ट्र्वादीचं विलिनीकरण होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून जोरात सुरू आहे. अजित पवार आणि शरद पवार दोघेही काही कार्यक्रमात एकत्र दिसले होते. त्यानंतर शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनीही त्यांच्या युतीची शक्यता वर्तवली होती. आता खुद्द अजित पवार गटातील नेत्यानं दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत मोठं विधान केलंय. पण शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार का? या प्रश्नाचं तथ्य आपण जाणून घेऊ.
राज्यात महानगरपालिकांचे पडघम वाजण्यास सुरुवात झालीय. प्रत्येक पक्ष आपल्या पक्षांची मोर्चेबांधणी करत आहे. अजित पवार गटही त्यापार्श्वभूमीवर तयारी करत आहे. राज्यातील सत्तेत सामील असतानाही अजित पवार गट काही ठिकाणच्या महानगरपालिकेच्या निवडणुका एकटाने लढण्याविषयी चाचपणी करत आहे. त्याच बाजुला शरद पवार यांनी युतीचं दिलेले संकेत यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चांनी जोर धरलाय. दुसरीकडे महायुतीच्या नेत्यांकडूनच त्याबाबत शक्यता वर्तवल्या जात आहेत.
लोकसभेत काकांनी पुतणे अजित पवार यांना चीतपट केलं होतं. तर विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांनी आपली दमखम दाखवला. दोन्ही निवडणुकीत एकमेकांना खुन्नस देणारे दोन्ही नेते विधानसभेच्या निवडणुकीनंतर सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र आले होते.
पुण्यातील साखर संकुलात शरद पवार आणि अजित पवार एकत्र आल्याचे पाहायला मिळाले होते. दुसरीकडे मराठीच्या मुद्द्यावरून राज-उद्धव ठाकरे एकत्र आलेत. भविष्यातील राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येतील असं चित्र राज्यात उभे झाले आहे. त्याचवेळी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशा चर्चा सुरू आहेत.
दरम्यान एकत्र येण्याची चर्चा असतानाच माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत काका-पुतणे आमनेसामने आले. सत्तेसाठी पक्ष बदलणाऱ्यांसोबत कोणत्याच प्रकारची युती होणार नाही, असं शरद पवार हे साखर कारखाना निवडणुकीच्या प्रचारात म्हणाले होते. त्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांनी एकमेकांवर टीका केली होती. त्यानंतर आता दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण होणार असल्याची चर्चा सुरू झालीय.
अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर भाष्य केलंय. पण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा दूर दूर पर्यंत नाहीये. त्याबाबतची चर्चा माझ्यापर्यंत पोहोचली नसल्याचं सुनील तटकरे म्हणालेत. जर असा काही निर्णय करायचा झाला तरी त्याबाबत भाजपाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला विचारावे लागेल. त्यांच्या विधानाला आमदार छगन भुजबळ यांनी दुजोरा दिलाय.
दुसरीकडे जनसुरक्षा कायद्या बाबत बोलतांना त्यांनी शरद पवार गटाच्या बाजुने भाष्य केलंय. राष्ट्रवादी कॉग्रेसचे विचार शरद पवार यांच्या विचारसरणीवर अवलंबून आहे. पण त्यांनी या कायद्याला विरोध केलाय. तर सत्तेतील पक्ष आहे. आणि विधिमंडळात या कायद्याचे पूर्ण वाचन झालेले आहे. त्यामुळे या कायद्याला आम्ही पाठिंबा दिला. पण याचा अर्थ शरद पवार यांच्या विचारांना नाकारणे असा होत नाही. त्याचवेळी त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत संभ्रम करणारे विधान केलंय.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेगवेगळे लढणार की महायुती म्हणून लढणार.पण त्या-त्या ठिकाणची परिस्थिती काय ते पाहिले जाईल, असंही तटकरे म्हणाले. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील असं आतातरी शक्य वाटत नाहीये. पण भविष्यात शरद पवार गट आणि अजित पवार हे एकत्र येऊ शकतात या विधानाला वाव असेन.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.