मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला
मुंबई, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी हवामान विभागाचा रेड अलर्ट
मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भाग जलमय
रत्नागिरी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट तर उर्वरित राज्यात येलो अलर्ट
प्रशासनाने नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन
Maharashtra Weather Update News राज्यात मान्सूनची प्रतीक्षा आता संपली आहे. सोमवारपासून मान्सूनने आगेकूच करत संपूर्ण महाराष्ट्र व्यापायला सुरुवात केली. गेले २ दिवस सुरु असलेली पावसाची रिमझिम सुखावणारी आहे. गेले कित्येक दिवस नागरिक उकाड्याने हैराण झाले होते. मात्र पावसाच्या सरींनी नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आज मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला असून कोकणात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये तुरळक पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान पहिल्याच पावसाचा फटका मुंबईकरांना बसला असून ठिकठिकाणी पाणी पोचल्याची माहिती आहे. त्यामुळे लोकलसेवेवरती देखील परिणाम झाल्याचे समोर आले आहे.
हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, आज मुंबईसह उपनगर, रायगड आणि पालघर जिल्ह्यांसाठी 'रेड अलर्ट' देण्यात आला असून पुढील काही तासांत अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यासाठी हवामान विभागाने 'ऑरेंज अलर्ट' जारी केला असून जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच सिंधुदुर्ग, सातारा घाटमाथा आणि पुणे जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज असल्याने 'येलो अलर्ट' देण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, मॉन्सूनने (Monsoon Update) पालघर ते वर्धा या पट्ट्यापर्यंत मजल मारली असून कोकण, मराठवाड्यासह राज्याचा बहुतांश भाग व्यापला आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्रातील उर्वरित भागांसह गुजरात आणि मध्य प्रदेशातील काही भागांतही मॉन्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे
मुंबईत मान्सूनच्या (Mumbai Rain Update) पहिल्याच दमदार सरींनी जनजीवन विस्कळीत केले. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागला. मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि कल्याण-डोंबिवली (Kalyan Dombivli Rain) परिसरात दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. पहिल्याच पावसाचा सर्वाधिक फटका मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या उपनगरीय रेल्वे सेवेला बसला. ट्रान्स हार्बर मार्गावरील पनवेल-ठाणे लोकल सेवा रेल्वे (Mumbai Local Train Update) रुळांवर पाणी साचल्यामुळे पूर्णपणे बंद ठेवण्यात आली. या मार्गावर अशी परिस्थिती प्रथमच निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. हार्बर मार्गावरील गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहेत. मध्य रेल्वेच्या गाड्यांनाही सुमारे १५ मिनिटांचा विलंब होत असून पश्चिम रेल्वेची वाहतूकही १० मिनिटे उशिराने सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.