रत्नागिरी येथे बोलताना विनायक राऊत यांनी मनोज जरांगे यांच्या उपोषणावर चिंता व्यक्त करत मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. "मनोज जरांगे यांच्या प्रकृतीचा विचार केला, तर त्यांना आता हे उपोषण झेपणारे नाही. सातत्याने केलेल्या उपोषणामुळे त्यांची तब्येत खालावत चालली आहे आणि ही गोष्ट महाराष्ट्रासाठी अजिबात योग्य नाही," असे ते म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी जरांगे यांनी सरकारच्या नादी लागू नये, असा सल्ला दिला तसेच मनोज जरांगे यांचे उपोषण सोडवण्याची संपूर्ण जबाबदारी ही सरकारचीच आहे, अशी स्पष्ट भूमिका मांडली. यासोबतच, "मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सणामध्ये विघ्न आणण्याचा प्रश्नच येत नाही," असे सांगत त्यांनी सरकारला मराठा आरक्षणासंदर्भातील आपली भूमिका लवकरात लवकर स्पष्ट करण्याचे आवाहन केले.
सोलापूर जिल्ह्यासह राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी स्वराज्यसंग्राम संघटनेने राज्य सरकारकडे केली आहे. राज्यातील चार-पाच जिल्हे वगळता बहुतांश भागात खरीप हंगाम वाया गेला असल्याचा दावा संघटनेने केला आहे.पावसाअभावी शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढावलं असून,सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावी,अशी मागणी करण्यात आली आहे.
राज्यातील ऊस,फळबागांसह इतर पिकंही संकटात सापडली आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात यंदा कोणतंही पीक शिल्लक राहते की नाही, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली असल्याचं स्वराज्यसंग्राम संघटनेचे म्हणणं आहे. याबाबत संघटनेचे अध्यक्ष तानाजीराव शिंदे यांनी राज्य सरकारकडे दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.
कोकणात जाणाऱ्या लेनवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
० माणगाव आणि इंदापूर जवळ झाली आहे वाहन कोंडी
० गणेशोत्सवासाठी गावी निघालेल्या कोकण वासियांना वाहतूक कोंडीचा फटका
० महामार्गावर वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक कोंडीची समस्या
० महामार्गावर मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात
० वाहतूक सुरळीत करण्याचे पोलिसांचे प्रयत्न
गणेशोत्सवाच्या निमित्ताने मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून मुंबईकर कोकणवासियांसाठी सोडण्यात आलेली दादर ते सावंतवाडी “मोदी एक्सप्रेस” शुक्रवारी रात्री ११.३० वाजता कणकवली रेल्वे स्थानकावर दाखल झाली. मागील १४ वर्षे अविरतपणे मंत्री नितेश राणे यांनी स्वखर्चाने मुंबईकर कोकणवासीय गणेशभक्तांना ही प्रवासाची मोफत सुविधा उपलब्ध करून दिली आहे. कोकण रेल्वेवर चालविण्यात आलेल्या या मोदी एक्सप्रेसमुळे हजारो गणेशभक्तांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित झाला आहे.
सांगलीच्या मिरजेमध्ये जनसुराज्य शक्ती पक्ष आणि भाजपा महायुतीची देवभाऊ चषक दहीहंडी मोठ्या उत्साहात पार पडली.वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीमध्ये दहीहंडी सोहळा पार पडला.दहीहंडी सोहळ्याच्या निमित्ताने सिने अभिनेते चंकी पांडे,अभिनेत्री मानसी नाईक,अभिनेत्री नेहा खान आणि पॉप सिंगर संजय राठोड यांनी आपल्या बहारदार अदाकारी सादर करत उपस्थितांची मने जिंकली केली.
नांदेड जिल्ह्यात पावसाअभावी शेतकरी संकटात असताना दुसरीकडे राजकीय नेत्यांकडून दहीहंडी उत्सवाच्या नावाखाली लाखो रुपयांची उधळण केली जात आहे. नांदेड दक्षिणचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आनंद पाटील बोंढारकर यांच्या वतीने हिंगोली गेट परिसरात भव्य दहीहंडी ‘आनंद उत्सव’ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या नृत्याचे आयोजन करून पैश्यांची उधळपट्टी केल्याने संताप व्यक्त केला जातोय. एकीकडे सोयाबीन आणि कापूस पिके पावसाअभावी वाळत असताना शेतकरी कोरडा दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदतीची मागणी करत आहेत.
ज्या क्षणाची नांदणी आणि पंचक्रोशीतील हजारो माधुरीप्रेमी तब्बल वर्षभरापासून आतुरतेने वाट पाहत होते... तो क्षण अखेर आला...! गेल्या वर्षी न्यायालयाच्या आदेशानंतर गुजरातमधील वनतारा येथे पाठवण्यात आलेली नांदणी जैन मठाची लाडकी हत्तीण माधुरी तब्बल एका वर्षानंतर पुन्हा आपल्या मायभूमीत परतली आहे... मध्यरात्री तब्बल दोन वाजता माधुरीने नांदणीच्या भूमीत पाऊल ठेवलं आणि तिच्या स्वागतासाठी रात्रभर जागलेल्या हजारो नागरिकांनी एकच जल्लोष केला... ढोल-ताशांचा गजर... फटाक्यांची आतषबाजी... जयघोष... आणि माधुरीच्या आवडीच्या फळांनी सजवलेली आरास... अशा भावनिक वातावरणात माधुरीचं नांदणीत पुनरागमन झालं...
गणेशोत्सवासाठी कोकणाकडे जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांची संख्या वाढताच, पनवेलमधील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे चित्र शुक्रवारी रात्री पाहायला मिळाले. जेएनपीटी-पळस्पे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून, पळस्पे पुलाच्या परिसरात अवजड वाहने तब्बल तीन रांगांमध्ये उभी राहिल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. या कोंडीचा फटका पुलापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरापर्यंत लागलेल्या वाहनांच्या रांगांना बसला.
मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज १५ वा दिवस आहे. "सरकारचे नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही," असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आज अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाची महत्त्वाची बैठक पार पडणार असून, या बैठकीनंतर मनोज जरांगे पाटील मुंबई आंदोलनाची तारीख जाहीर करणार आहेत. त्यामुळे अंतरवाली सराटीतील या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला पुन्हा एकदा अंतरवाली सराटी येथे एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे आज मनोज जरांगे मुंबई आंदोलनाची कोणती तारीख जाहीर करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.