रणजित माजगावकर
कोल्हापूर : पौराणिक आणि ऐतिहासिक वारशाची परंपरा लाभलेल्या कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवास राज्य सरकारने राज्य महोत्सवाचा दर्जा दिला आहे. यामुळे कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या महोत्सवाची राज्य पर्यटन विभागाच्या दिनदर्शिकित प्रमुख पर्यटन महोत्सव (सन २०२५-२६) अशी नोंद करण्यात आली आहे.
कोल्हापूर जिल्हा हा राजर्षी शाहू छत्रपती यांची जन्मभूमी व कर्मभूमी आहे. या शहराला पौराणिक व ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. त्यानुसार कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव हा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या काळापासून साजरा केला जातो. म्हैसूरच्या दसरा महोत्सवाप्रमाणेच हा शाही महोत्सव लोकप्रिय होत आहे. दरम्यान कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या महोत्सवास राज्य महोत्सवाचा दर्जा मिळण्यासाठीचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला होता.
महोत्सवांतर्गत होणार विविध उपक्रम
सन २०२३ मध्ये दसरा महोत्सवास राज्य महोत्सवाचा दर्जा देण्याबाबत घोषणा झाली होती. परंतु त्यावर अद्याप काही कार्यवाही झाली नव्हती. यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी याबाबत सरकारकडे प्रस्ताव सादर करून पाठपुरावा केला. त्यानुसार सरकारने दसरा महोत्सवास राज्य महोत्सवाचा दर्जा देण्याची घोषण केली. या महोत्सवांतर्गत २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत विविध उपक्रम होणार आहेत.
पर्यटनाचा वारसा
जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झालेल्या किल्ले पन्हाळगड तसेच श्री अंबाबाई मंदिर, श्री क्षेत्र जोतिबा मंदिर, दाजीपूर अभयारण्य, कणेरीमठ, आंबा घाट, खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर आदी पर्यटनाच्या दृष्टीने अनेक स्थळे जिल्ह्यात आहेत. पर्यटकांना निवासासाठी मुबलक प्रमाणात हॉटेल्स, लॉजिंग, धर्मशाळाही आहेत. आता दसरा महोत्सवास राज्याचा मुख्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यामुळे पर्यटक कोल्हापूरमध्ये किमान दोन दिवस मुक्कामी राहून दुसऱ्या दिवशी अन्य पर्यटन स्थळांना जाऊन पर्यटनाचा आनंद घेऊ शकतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.