सूरज सावंत | मुंबई
महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फटका काँग्रेसला बसताना दिसत आहे. मुंबईत जागावाटपाच्या मुद्द्यावरुन मिलिंद देवरा यांनी आधीच काँग्रेसची साथ सोडली आहे. त्यात आता संजय निरुपम यांच्या नाराजीमुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर केल्याने संजय निरुपम नाराज होते. याबाबत त्यांनी जाहीर नाराजीदेखील व्यक्त केली होती. मात्र आता संजय निरुपम यांनी आपले जुने सहकारी आणि भाजप खासदार अशोक चव्हाण यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
संजय निरुपम यांनी मंगळवारी रात्री अशोक चव्हाण यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र संजय निरुपण यांनी वेगळा निर्णय घेतल्यास महाविकास आघाडीला याचा फटक बसू शकतो.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत म्हटलं की, संजय निरुपम यांच्याशी आमची कोणतीही चर्चा झाकेली नाही. राजकीय नेत्यांची भेट घेणे यात काही चुकीचे नाही. आम्ही पण विरोधी नेत्यांना भेटतो. पण विकासासाठी कुणी येणार असेल तर त्यांचं स्वागत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठी गळती लागली आहे. मुंबईत माजी खासदार मिलिंद देवरा आणि माजी आमदार बाबा सिद्धीकी यांनी आधीच पक्षाला रामराम ठोकला आहे. मिलिंद देवरा यांनी शिवसेनेत तर बाबा सिद्धिकी यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
तर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसचे माजी आमदार पद्माकर वळवी यांनी देखील पक्षाला रामराम केला आहे. आजच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.