बालाजी सुरवसे, प्रतिनिधी
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या आंदोलनात आता उभी फूट पडल्याचं चित्र दिसतंय. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मराठा क्रांती ठोक मोर्चाने विरोध दर्शवला असून जरांगे पाटील मराठा समाजाची फसवणूक करत असल्याचा गंभीर आरोप संघटनेने केलाय. तसंच मराठा समाजाला ५० टक्क्यांच्या आत आरक्षण मिळावं या मागणीसाठी राज्यभर आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक सुनील नागणे यांनी धाराशिवमध्ये ही भूमिका स्पष्ट केलीये. त्यांच्या म्हणण्यानुसार, २०१३-१४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी १६ टक्के आरक्षण देऊन समाजाची फसवणूक केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी १२ ते १३ टक्के आरक्षण दिलं, त्यातूनही समाजाची फसवणूक झाल्याचा आरोप त्यांनी केला. आता मनोज जरांगे पाटील यांची भूमिका देखील मराठा समाजाच्या अपेक्षांशी विसंगत असल्याचे नागणे यांनी म्हटले.
मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती ठोक मोर्चाने सरकारकडे सातत्याने ज्या मराठा समाजाच्या नोंदी केवळ ‘मराठा’ म्हणून आहेत, त्यांना ५० टक्क्यांच्या मर्यादेत ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. हे आरक्षण आमचा हक्क असल्याचे संघटनेचं म्हणणं आहे.
मात्र, मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या बैठकीत हे आंदोलन सरसकट मराठा समाजासाठी नसून, ज्यांच्या कुणबी नोंदी सापडत आहेत, त्यांच्यासाठी असल्याचं स्पष्ट केल्याचा दावा नागणे यांनी केला.
त्यामुळे यापुढे जरांगे पाटील यांच्या भूमिकेपासून वेगळी भूमिका घेत स्वतःची आरक्षणाची लढाई लढणार असल्याचे त्यांनी सांगितलं. या संपूर्ण प्रकरणात प्रसाद लाड आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचीही भूमिका समाजाला फसवण्यात महत्त्वाची असल्याचा आरोप करण्यात आला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.