स्ट्रोक ही सर्वात गंभीर स्थिती मानली जाते. काही सेकंदांचा उशीरही एखाद्याचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतो. त्यामुळे स्ट्रोकची लक्षणं ओळखणं आणि योग्य वेळी योग्य पावलं उचलणं अत्यंत गरजेचं ठरतं. मुळात स्ट्रोक तेव्हा होतो ज्यावेळी मेंदूकडे जाणारा रक्तपुरवठा कमी होतो किंवा पूर्णपणे थांबतो. त्यामुळे मेंदूला ऑक्सिजन मिळत नाही आणि काही मिनिटांतच मेंदूतील पेशी नष्ट होऊ लागतात.
स्ट्रोकची लक्षणं पटकन ओळखण्यासाठी डॉक्टरांनी FAST हा सोपा फॉर्म्युला सांगितला आहे.
Face म्हणजे चेहरा – व्यक्तीला हसायला सांगितल्यावर चेहऱ्याचा एक भाग खाली झुकतोय का हे पाहावं.
Arms म्हणजे हात – दोन्ही हात वर उचलायला सांगितल्यावर एक हात खाली जातोय का हे लक्षात घ्यावं.
Speech म्हणजे बोलणं – बोलण्यात अडथळा येतोय का, शब्द अस्पष्ट आहेत का हे तपासावं.
Time म्हणजे वेळ – अशी लक्षणं दिसली की लगेच कृती करणं आवश्यक आहे.
जर कुणाला स्ट्रोकचा संशय आला तर सर्वप्रथम तात्काळ आपत्कालीन क्रमांकावर फोन करावा. भारतात 108 हा नंबर डायल करून मदत मागवता येते. ‘टाइम इज ब्रेन’ हा मंत्र लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. कारण उशीर झाला तर मेंदूचं कायमस्वरूपी नुकसान होऊ शकतं.
अशावेळी घाबरून न जाता शांत राहणं गरजेचं आहे. लक्षणं नेमकी कधी सुरू झाली याची वेळ लक्षात ठेवावी. कारण डॉक्टरांना उपचार ठरवताना ही माहिती खूप उपयोगी पडते.
व्यक्तीला सरळ बसवावं किंवा थोडं मागे टेकून ठेवावं. तो सुरक्षित आहे आणि पडणार नाही याची काळजी घ्यावी. तो शुद्धीत आहे का हे सतत पाहत राहणंही आवश्यक आहे.
रुग्णाची अवस्था बदलतेय का, श्वास घेण्यास त्रास होतोय का, बेशुद्ध पडतोय का किंवा झटके येत आहेत का हे सतत निरीक्षणात ठेवावं. डॉक्टर आल्यावर सर्व माहिती त्यांना द्यावी.
स्ट्रोकच्या वेळी काही गोष्टी टाळणं महत्त्वाचं आहे. रुग्णाला काहीही खायला किंवा पिण्यास देऊ नये. अशावेळी रूग्णाला कारण गिळण्यास त्रास होऊ शकतो आणि गुदमरण्याचा धोका वाढतो. डॉक्टरांचा सल्ला न घेता कोणतीही औषधं देऊ नयेत, कारण चुकीचं औषध परिस्थिती बिघडवू शकतं.
लक्षणं आपोआप कमी होतील असं वाटून थांबू नये. अगदी हलकी लक्षणं असली तरी ती गंभीर स्ट्रोकची सुरुवात असू शकते. रुग्णाला पूर्णपणे झोपवू नये, त्याचं डोकं थोडं उंच ठेवणं गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे रुग्णाला एकटं सोडू नये.
योग्य वेळी उपचार मिळाले तर मेंदूचं नुकसान कमी करता येतं आणि रुग्णाच्या बरे होण्याची शक्यता वाढते. काही उपचार फक्त सुरुवातीच्या काही तासांतच प्रभावी ठरतात. उशीर झाल्यास पक्षाघात, बोलण्यात अडथळे, स्मरणशक्ती कमी होणं किंवा कायमस्वरूपी अपंगत्व अशा गंभीर परिणामांना सामोरं जावं लागू शकतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.