Tyanchi Vari: कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI तंत्रज्ञानाच्या सहाय्याने संपूर्णपणे साकारलेला ‘त्यांची वारी’ हा मराठी चित्रपट नुकताच पूर्ण झाला आहे. दिग्दर्शक आशुतोष भालेराव आणि त्यांच्या टीमने हा महत्त्वाकांक्षी प्रयोग साकारला असून, मराठी चित्रपटसृष्टीत तंत्रज्ञानाच्या नव्या पर्वाची सुरुवात म्हणून या चित्रपटाकडे पाहिले जात आहे. AI तंत्रज्ञानाचा वापर करून संपूर्ण चित्रपट तयार करण्याचे प्रयोग जगभरात अद्याप दुर्मिळ आहेत. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातून मराठी भाषेत संपूर्ण AI-आधारित चित्रपटाची निर्मिती करण्याचा प्रयत्न विशेष लक्षवेधी ठरला आहे.
‘त्यांची वारी’मधील प्रत्येक दृश्य, पात्रांची निर्मिती, गीत, पार्श्वसंगीत AI तंत्रज्ञानाच्या सहाय्याने साकारण्यात आली आहे. त्यामुळे पारंपरिक पद्धतींपेक्षा वेगळ्या तंत्राचा वापर करून चित्रपट तयार करण्याचा हा अभिनव प्रयोग ठरला आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक आशुतोष भालेराव यांच्या मते, AI तंत्रज्ञान अद्याप विकसित होण्याच्या प्रक्रियेत आहे. या तंत्रज्ञानाला अनेक मर्यादा असूनही, नव्या तंत्रज्ञानाच्या शक्यता तपासण्यासाठी आणि त्याचा कलाक्षेत्रात प्रयोग करण्यासाठी ‘त्यांची वारी’ हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
चित्रपटाची कथा, संवाद, गीत लेखन, संगीत, पार्श्वसंगीत आणि दिग्दर्शन आशुतोष भालेराव यांनी केले आहे. निर्माती डॉ. अरुंधती भालेराव असून, निर्मिती भालेरावज इव्हेंट्स अँड मॅनेजमेंट कंपनीची आहे. पटकथा देवाशिष शेडगे, राजशेखर कुलकर्णी आणि आशुतोष भालेराव यांनी लिहिली आहे. चित्रपटाचे एडिटिंग चिन्मय शिवलकर, ऑडिओ पोस्ट प्रोडक्शन सिद्धार्थ हजारे, तर DI आणि कलरचे काम प्रतीक जांभळे यांनी केले आहे. AI आणि चित्रपटनिर्मितीच्या संगमातून साकारलेला ‘त्यांची वारी’ हा प्रयोग मराठी चित्रपटसृष्टीला तंत्रज्ञानाच्या नव्या शक्यता तपासण्याची संधी देणारा ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.