देशभरातील लाखो सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्स सध्या 8व्या वेतन आयोगाच्या निर्णयाची लावून बसले आहेत. नवीन वेतन आयोगामुळे पगार आणि पेन्शनमध्ये किती वाढ होणार तसंच ही वाढ नेमकी कधीपासून लागू होणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. याच मुद्द्यावर संसदेतही सरकारला प्रश्न विचारण्यात आला. त्यावर केंद्र सरकारने महत्त्वाची माहिती दिली आहे.
8व्या वेतन आयोगाच्या कामाला सुरुवात होऊन जवळपास 9 महिने झाले आहेत. या काळात आयोगाकडून विविध कर्मचारी संघटना आणि संबंधित संस्थांशी चर्चा केली जातेय. नुकतीच आयोगाची दिल्लीतील बैठक पार पडली असून आता पुढील बैठक जयपूरमध्ये होणार आहे. त्यामुळे आयोगाचं काम सध्या नेमकं कोणत्या टप्प्यावर आहे आणि पगारवाढीबाबत सरकारने काय स्पष्ट केले आहे, हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं.
सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू असताना सरकारला विविध विषयांवर प्रश्न विचारले गेले. त्याचवेळी 8व्या वेतन आयोगाबाबतही सरकारला प्रश्न करण्यात आला. 8वा वेतन आयोग नेमका कधी लागू होणार? त्याबाबत सरकारकडून अधिकृत घोषणा कधी केली जाणार? तसंच पगारवाढीची तारीख निश्चित झाली आहे का? असे प्रश्न संसदेत उपस्थित करण्यात आले.
या प्रश्नाला केंद्रीय अर्थ मंत्रालयाने उत्तर दिलंय. मंत्रालयाने सांगितलं की, 8व्या वेतन आयोगाची स्थापना 3 नोव्हेंबर 2025 रोजी केंद्र सरकारच्या आदेशानुसार करण्यात आली. नियमांनुसार, वेतन आयोगाला शिफारशी आणि अहवाल सरकारकडे सादर करण्यासाठी 18 महिन्यांचा कालावधी देण्यात आलाय. त्यामुळे सध्या आयोग ठरवून दिलेल्या मुदतीत काम पूर्ण करण्याच्या दिशेने पुढे जात आहे.
या आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्याकडे देण्यात आलीये. पुलक घोष हे आयोगाचे अर्धवेळ सदस्य आहेत, तर पंकज जैन यांची सदस्य-सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर त्याचा परिणाम मोठ्या संख्येने सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्सवर होणार आहे. या आयोगाच्या शिफारशींचा परिणाम पुढील 10 वर्षांच्या कालावधीतील वेतन आणि पेन्शन व्यवस्थेवर होण्याची शक्यता आहे.
सरकारी आकडेवारीनुसार, 1 मार्च 2026 रोजी देशात सुमारे 35.77 लाख केंद्रीय नागरी कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांचा 8व्या वेतन आयोगाच्या कक्षेत समावेश होतो. 31 डिसेंबर 2025 पर्यंत देशात सुमारे 33.76 लाख पेन्शनर्स आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारक आहेत. या आकडेवारीमध्ये संरक्षण विभागातील पेन्शनर्सचा समावेश करण्यात आलेला नाही.
नवीन वेतन आयोगाकडून सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्सशी संबंधित अनेक महत्त्वाच्या बाबींवर शिफारशी केल्या जाणार आहेत. या शिफारसी खालीलप्रमाणे-
सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुधारणा आणि पगारवाढ
महागाई भत्ता म्हणजेच DA आणि इतर भत्त्यांमध्ये बदल
पेन्शनमध्ये सुधारणा
कुटुंब निवृत्तीवेतनाबाबतचे निर्णय
सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना सर्वाधिक उत्सुकता आहे ती म्हणजे पगारात किती वाढ होणार आणि ती कधीपासून लागू होणार. मात्र केंद्र सरकारने अजूनही पगारवाढीची किंवा 8वा वेतन आयोग लागू करण्याची कोणतीही ठराविक तारीख जाहीर केलेली नाही.
अर्थ मंत्रालयाच्या माहितीनुसार, आयोगाला आपला अंतिम अहवाल सादर करण्यासाठी 18 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. त्यामुळे आयोगाकडे अजून जवळपास 9 महिन्यांचा वेळ शिल्लक आहे. आयोगाचा अंतिम अहवाल आल्यानंतरच पगार, पेन्शन आणि इतर मागण्यांबाबत पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
अर्थ मंत्रालयाच्या माहितीनुसार, आयोगाला आपला अंतिम अहवाल सादर करण्यासाठी 18 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. त्यामुळे आयोगाकडे अजून जवळपास 9 महिन्यांचा वेळ शिल्लक आहे. आयोगाचा अंतिम अहवाल आल्यानंतरच पगार, पेन्शन आणि इतर मागण्यांबाबत पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.