अजय सोनवणे
मनमाड (नाशिक) : मागील काही दिवसांपासून कांद्याचे दर सातत्याने कोसळत होते. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला होता. दरम्यान कांद्याचे कोसळणारे बाजार भाव आता स्थिरावले आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. नाशिकच्या लासलगाव बाजार समितीत सध्या कांद्याला सरासरी बाजार भाव २ हजार ४०० रुपये इतका भाव मिळत आहे.
मागील काही दिवसांपासून कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलेला होता. अवकाळी पावसामुळे कांदा पिकाला फटका बसला होता. अशात देखील उत्पादित झालेल्या कांद्याला भाव मिळत नव्हता. बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात घसरण होत असल्याचे पाहण्यास मिळत होते. यामुळे शेतकरी अडचणीत सापडला होता. मात्र आता कांद्याचे दर काही प्रमाणात स्थिरावले असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
२४०० वर कांद्याचे दर स्थिरावले
गेल्या आठवड्यात कांद्याचे बाजार भाव दोन हजार रुपयांच्या आत सतराशे ते अठराशे रुपयांपर्यंत कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते. मात्र आता कोसळणाऱ्या कांदा बाजार भावाला ब्रेक लागला असून कोसळणारे कांद्याचे सरासरी बाजार भाव २ हजार ४०० रुपयांपर्यंत स्थिरवल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या दरांमध्ये आणखी वाढ होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.
जास्तीत जास्त २९०० पर्यंत दर
दरम्यान नाशिकच्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत १ हजार ५५५ वाहनातून २८ हजार ५१२ क्विंटल कांद्याची आवक विक्रीसाठी दाखल झाली होती. कांद्याला प्रति क्विंटल जास्तीत जास्त २ हजार ९५१ रुपये आणि कमीत कमी एक हजार रुपये तर सरासरी २ हजार ४०० रुपये इतका बाजार भाव प्रतिक्विंटल कांद्याला मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.