जळगाव : यंदा कापसाची लागवड बऱ्यापैकी झाली आहे. मात्र पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे कापसाचे उत्पादन कमी होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. तर दुसरीकडे कापसाला भाव देखील चांगल्या प्रकारे मिळत नसल्याने यंदा निर्यात ठप्प आहे. आतापर्यंत केवळ तीन लाख गाठींचीच खरेदी झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांवरील संकट वाढत चालले आहे.
शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळख असलेल्या कापसाला हवा तसा भाव मिळत नसल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. भाव वाढतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अजूनही आपला माल घरात ठेवलेला आहे. दरम्यान, भारताकडून होणारी कापसाची निर्यात ही थांबलेली असल्याने कापसाला फारसा उठाव नसल्याची माहिती खान्देश जिनिंग असोसिएशनचे संस्थापक अध्यक्षांनी दिली आहे.
दोन वर्षांपूर्वी कापसाला चांगला भाव मिळाला होता. त्यामुळे त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला होता. मात्र, त्यानंतर कापसाच्या दरात प्रत्येक वर्षी घसरण होताना दिसत आहे. यावर्षी तर हमीभावापेक्षाही कमी भावात शेतकऱ्यांना आपला माल विक्री करण्याची वेळ आली आहे. एकीकडे रासायनिक खतांच्या किमती वाढत आहे. मजुरांचा खर्च वाढत आहे, अशा परिस्थितीत कापसाचे दर कमी होत असल्याने कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.
शेतकरी संकटात
यंदाच्या पावसाळ्यात कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाची संततधार असल्याने यंदा फुलधारणा देखील कमीच झाली आहे. परिणामी यंदा फारसे उत्पादन मिळत नाही. एकीकडे उत्पादन कमी आणि दुसरीकडे भाव कमी असल्याने शेतकऱ्यावर संकट ओढवले आहे. दिवाळीनंतर कापूस खरेदीला सुरवात झाली असताना चांगला भाव नसल्याने शेतकऱ्यांनी भाव वाढीच्या अपेक्षेने कापूस घरात भरून ठेवला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.