पंढरपूर: राज्यात सर्वाधिक सोलापूर जिल्ह्यात (Solapur District) डाळिंबाचे उत्पादन (Pomegranate Orchard) घेतले जाते. सततच्या हवामान बदलामुळे (Climate Change) आणि मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाचा डाळिंब शेतकऱ्यांचा मोठा फटका बसला आहे. डाळिंब बागांवर तेल्या, मर, करपा या सारख्या विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. या रोगामुळे पंढरपूर तालुक्यातील सुमारे 20 हजार एकर क्षेत्रावरील डाळिंबा बागा उध्दवस्थ झाल्या आहेत . यामध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांना सुमारे 125 कोटींचा आर्थिक फटका बसला आहे.
राज्य आणि केंद्र सरकारने डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जात आहे. सोलापूरची दुष्काळी जिल्हा अशी ओळख आहे. जिल्ह्यात सुमारे 80 हजार हेक्टर क्षेत्रावर डाळिंबाचे उत्पादन घेतले जाते. सर्वाधिक उत्पादन आणि निर्यात करण्यात पंढरपूर व सांगोला तालुक्याचा मोठा वाटा आहे.
सततच्या हवामान बदलामुळे डाळिंब शेती संकटात आली आहे. मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे डाळिंबावर तेल्या, मर,करपा अशा विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. किडींचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शेतकरी प्रयत्न करुन थकले आहेत. औषध फवारणीवर हजारो रुपयांचा खर्च करुनही प्रादुर्भाव कमी होत नसल्याने तो वाया गेल्या आहे. त्यामुळे शतकरी ही आता हतबल झाले आहेत
यावर्षी उत्पन्न तर मिळाले नाही शिवाय औषध फवारणी आणि मजूरीच्या वाढत्या खर्चामुळे डाळिंब शेतकरी कर्ज बाजारी झाले आहेत. पंढरपूर तालुक्यात 30 हजार एकरावर डाळिंबाचे उत्पादन घेतले जाते. यापैकी जवळपास 20 हजार क्षेत्रावरील डाळिंब बागांचे पावसामुळे नुकसान झाले असून एकरी पाच लाखांचा फटका बसला आहे. पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना सुमारे 125 कोटींचा फटका बसला आहे. पावसामुळे पुढच्यावर्षी होणाऱ्या निर्यात डाळिंबात देखील घट झाली आहे.
गादेगाव येथील शेतकरी प्रशांत डोंगरे यांची तीन एकर डाळिंबाची बाग आहे. यावर्षी चांगला दर मिळेल या आशेवरती त्यांनी तीन लाख रुपयांचा खर्च केला आहे. बाग फळावर आली आहे. अशातच मागील काही दिवसांपासून पाऊस सुरु असल्यामुळे बागेवर विविध किड रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. तेल्यारोगामुळे फळांना तडे गेले आहेत. तर करप्यामुळे डाळिंबाची झाडे जागेवरती वाळू लागली आहेत.
यामध्ये डोंगरे यांचे मोठे नुकसान झाले आहे. यावर्षी त्यांना तीन एकर बागेतून आठ ते दहा लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित होते. परंतु पावसाने त्यावर पाणी फिरले आहे. डोंगरे यांच्या सारख्या अनेक शेतकऱ्यांच्या डाळिंब बागांचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने नुकसान झालेल्या बागांचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी पंढरपूर व सांगोला तालुक्यातील शेतकरी करु लागले आहेत.
Edited By: Pravin Dhamale
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.