भारतीय संघ येत्या जून महिन्यात टी -२० वर्ल्डकप खेळण्यासाठी वेस्टइंडीजला रवाना होणार आहे. या स्पर्धेसाठी लवकरच भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे. या संघात स्थान मिळवण्यासाठी सर्वच खेळाडूंमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. दरम्यान शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल या फलंदाजांना सलामीवीर फलंदाज म्हणून स्थान मिळणार अशी चर्चा सुरू असताना अभिषेक शर्माने वादळी खेळी केली आहे. त्याने या संपूर्ण हंगामात धावांचा पाऊस पाडत भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी दावा केला आहे.
आयपीएल २०२४ स्पर्धेत अभिषेक शर्माने धावांचा पाऊस पाडला आहे. पावरप्लेच्या षटकात फलंदाजी करताना त्याने एकाही गोलंदाजाला सोडलं नाही. शनिवारी झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. हा सामन्यात अभिषेक शर्माने पहिल्या चेंडूपासून हल्लाबोल करायला सुरुवात केली. त्याने २ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ४६ धावा केल्या. त्याला आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सर्वात वेगवान अर्धशतक झळकावण्याची संधी होती. मात्र चौकार मारण्याच्या प्रयत्नात तो बाद होऊन माघारी परतला.
अभिषेक शर्मा आयपीएल २०२४ स्पर्धेत तुफान फॉर्ममध्ये आहे. त्याने मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात २३ चेंडूंचा सामना करत ६३ धावांची तुफानी खेळी केली होती. या खेळीदरम्यान त्याने ३ चौकार आणि ७ षटकार मारले होते. त्याने आपल्या तुफान फकेबाजीने निवड कर्त्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यासह संघात स्थान मिळवण्यासाठी दावा केला आहे. त्याच्या आयपीएल २०२४ स्पर्धेतील आतापर्यंतच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने ७ सामन्यांमध्ये २१५.९७ च्या स्ट्राइक रेटने २५७ धावा केल्या आहेत.
यादरम्यान त्याने १८ चौकार आणि २४ षटकार खेचले आहेत. अभिषेक शर्माची ही कामगिरी पाहता यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिलच्या टेन्शनमध्ये नक्कीच वाढ झाली असणार आहे. कारण रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात करण्यासाठी शुभमन गिल यशस्वी जयस्वालपैकी एकाला संधी मिळण्याची चर्चा सुरू आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.