नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. त्रिनिदाद येथील क्वीन्स पार्क ओव्हल मैदानावर शुक्रवारी या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील पहिला सामना खेळला गेला. दमदार झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने तीन धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. या सामन्याचा खरा हिरो ठरला 36 वर्षीय अनुभवी फलंदाज आणि कर्णधार शिखर धवन. (India vs West indies Odi Latest News)
नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रण मिळालं. सलामीला आलेल्या कर्णधार शिखर धवनने भारतीय संघाच्या डावाची सुरुवात करताना 99 चेंडूत 97 धावांची सुरेख खेळी केली. मात्र, त्याचे 18 वे एकदिवसीय शतक अवघ्या तीन धावांनी हुकले. धवनने आपल्या उत्कृष्ट खेळीत 10 चौकार आणि तीन उंच षटकार मारले.
दरम्यान, कालच्या सामन्यादरम्यान वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजकडून मैदानात मोठी चूक झाली. वेस्ट इंडिज संघाला विजयासाठी शेवटच्या षटकात 15 धावांची गरज होती. त्याचवेळी, रोमारियो शेफर्ट (31 धावा) आणि अकील हुसेन (32 धावा) मैदानावर होते.
कर्णधार शिखर धवनने वेगवान गोलंदाज मोहमद सिराजला 15 धावा वाचवण्याची जबाबदारी दिली. मोहमद सिराजने पहिल्या 4 चेंडूत फक्त 7 धावा दिल्या. मात्र पाचवा चेंडू यॉर्कर टाकण्याच्या नांदात त्याने नियंत्रण गमावलं आणि चेंडू थेट लेग साईटच्या बाहेर फेकला.
शेफर्टने हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू खूपच बाहेर होता. त्यावेळी यष्टीमागे असलेल्या संजू सॅमसनने आपल्या डावीकडे झेप घेत चेंडू पकडला. भारतीय संघाचं नशीब बलवंतर म्हणून संजू सॅमसनची झेप चेंडूपर्यंत पोहचली.
जर चेंडू त्याच्या हातात आला नसता तर वेस्ट इंडिजला 5 धावा मिळाल्या असत्या आणि शेवटच्या दोन चेंडूत त्यांना विजयासाठी केवळ 3 धावांची गरज असती. दरम्यान, या सर्व प्रकारानंतर सिराजलाही आपली चूक कळाली. त्याने पुढचे दोन चेंडू योग्य टप्प्यावर टाकले आणि भारताने हा सामना 3 धावांनी जिंकला.
Edited By - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.