चेन्नई कसोटीत भारतीय संघाचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. भारतीय संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना ३७६ धावांचा डोंगर उभारला. त्यानंतर गोलंदाजीतही भारतीय गोलंदाजांनी हवा केली आणि बांगलादेशचा पहिला डाव अवघ्या १४९ धावांवर संपुष्टात आणला आहे. भारतीय संघाकडून गोलंदाजी बुमराहने सर्वाधिक ४ गडी बाद केले. यासह भारतीय संघाने पहिल्या डावात २२७ धावांची मोठी आघाडी घेतली आहे.
या सामन्यात भारतीय संघाने केलेल्या ३७६ धावांचा पाठलाग करताना बांगलादेशला हवी तशी सुरुवात करता आली नाही. तर दुसरीकडे वेगवान गोलंदाजांनी भारतीय संघाला दमदार सुरुवात करुन दिली. पहिल्याच षटकात बुमराहने शदमन इस्लामनला २ धावांवर गारद केलं.
त्यानंतर उरलेली कसर आकाश दीपने नवव्या षटकात पूर्ण केली. त्याने पहिल्याच चेंडूवर जाकीर हसन तर दुसऱ्या चेंडूवर मोमिनूल हकची दांडी गुल केली. अवघ्या २२ धावांवर बांगलादेशला तिसरा धक्का बसला. त्यानंतर शाकीब अल हसनने ३२ आणि लिटन दासने २२ धावा करत संघाचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना संघासाठी मोठी खेळी करता आली नाही.
या डावात भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ४ गडी बाद केले. तर आकाश दीप आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी २-२ गडी बाद केले. या शानदार गोलंदाजीच्या जोरावर बांगलादेशचा डाव १४९ धावांवर आटोपला.
या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. भारतीय संघातील टॉप ऑर्डरच्या फलंदाजांना या डावात मोठी खेळी करता आली नाही. त्यानंतर यशस्वी जयस्वालने ५६ धावांची शतकी खेळी केली. तर रिषभ पंतने ३६ धावांची खेळी केली. शेवटी अश्विनने १०८ आणि रविंद्र जडेजाने ८६ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने ३७६ धावांपर्यंत मजल मारली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.