
विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने महाविकास आघाडीचा दारूण पराभव केला. हा पराभव महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांच्या जिव्हारी लागला आहे. या पराभवानंतर काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या राजीनाम्याची मागणी केली आणि त्यांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली.
विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या सुमार कामगिरीबाबत काँग्रेसच्या राज्यातील महिला खासदारांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी विधानसभेला अपयश येण्यामागचं कारण त्यांना सांगितले असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
महाराष्ट्रातील खासदार वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे, शोभा बच्छाव आणि प्रतिभा धानोरकर या महिला खासदारांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची मंगळवारी रात्री भेट घेतली. महाविकास आघाडीतील मित्रपक्षांकडून अडचणीत आणण्याचा प्रकार आणि काँग्रेस संघटनेतील गोंधळ यामुळं अपयश आल्याची माहिती या महिला खासदारांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना दिली. सोबतच, काँग्रेसच्या जबाबदार नेत्यांनी स्वतः भावी मुख्यमंत्री म्हणत आपल्याच जवळच्या व्यक्तींना उमेदवारी वाटप केल्याने हा दारुण पराभव झाल्याचीही माहिती त्यांनी दिली.
राहुल गांधी यांच्यासमोर काँग्रेसच्या महिला खासदारांनी महाराष्ट्रातील पराभवाबद्दल उघडपणे आपले म्हणणे मांडले. उमेदवारी वाटप करताना पक्षाच्या नेत्यांनी स्थानिक खासदारांची मते विचारात घेतली नाहीत. तसंच सर्वच बडे नेते स्वतःला भावी मुख्यमंत्री मानून उमेदवार ठरवत राहिले आणि अन्य नेत्यांना अडचणीत आणण्याचे प्रकार झाल्याची भावना व्यक्त केली. याशिवाय शिवसेनेकडून जागा वाटपात झालेली आडकाठी, प्रचारात एकवाक्यता नसणे याबाबतही राहुल गांधींकडे तक्रार करण्यात आली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.