देशामध्ये सध्या ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. काही राज्यांमध्ये पावसाने (Rainfall) कहर केला आहे. या ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर काही राज्यांमध्ये उष्णतेची लाट पसरली आहे. वाढत्या तापमानामुळे या राज्यांमधील जनता त्रस्त झाली आहे. दिल्लीसह (Delhi) उत्तर भारतातील सर्व राज्यांमध्ये उष्णतेची लाट (Heat Wave) कायम आहे.
उन्हाच्या तडाक्यामुळे अंगातून घामाच्या धारा निघत आहेत. कडाक्याच्या उन्हामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. अशामध्ये आता हवामान खात्याने (Weather Department) देशातील काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर काही राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेमुळे रेड अलर्ट जारी केला आहे.
भारतातील सर्वात उष्ण राज्यांच्या यादीत राजस्थान हे राज्य आघाडीवर असते. यावर्षीच्या उन्हाळ्यात येथील वातावरण अतिशय उष्ण आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, या आठवड्यात राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये उन्हाचा पारा चढणार आहे. या ठिकाणी शनिवार आणि रविवारपर्यंत तापमान 46 अंशांवर पोहोचेल, असा अंदाज आहे.
मध्य प्रदेशमध्ये तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. याठिकाणी उष्ण वारे वाहत आहेत. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. बुरहानपूर जिल्ह्यात तापमानाचा पारा उच्चांकावर पोहोचला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, या आठवड्यात येथील पारा ४५ अंशांच्या आसपास राहणार आहे.
उत्तर प्रदेशमध्ये उष्णतेची लाट आहे. राज्याची राजधानी लखनऊमध्ये तापमान 40 अंशांच्या पुढे जात आहे. परंतु या आठवड्यात तापमान 42-43 अंशांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्याचवेळी, नोएडा आणि गाझियाबादमध्ये तापमान 43 अंश आहे. याशिवाय आग्रामध्ये तापमान ४५ अंशांच्या जवळ आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील देशाची राजधानी दिल्लीमध्ये उष्णतेची लाट आहे. उष्णतेची लाट लक्षात घेता विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्या 10 दिवस अगोदर जाहीर केल्या आहेत. दिल्लीत हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, या आठवड्यात दिल्लीत कडक ऊन पडणार आहे. शनिवार आणि रविवारपर्यंत तापमान 46 अंशांवर पोहोचण्याची शक्यता आहे.
एकीकडे उत्तर भारतामध्ये उष्णतेची लाट आहे. तर दुसरीकडे भारताच्या दक्षिण भागात पावासाने कहर केला आहे. दक्षिण भारतातील राज्यात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे केरळ आणि तामिळनाडूमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. केरळमधील 4 जिल्ह्यांमध्ये तसेच राजधानी तिरुवनंतपुरममध्ये मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याच्या शक्यतेमुळे हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. मच्छीमारांना समुद्रकिनाऱ्यांपासून दूर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.