नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या (Winter session) पहिल्याच दिवशी विरोधी पक्षांच्या १२ सदस्यांच्या निलंबनाचा मुद्दा दोन्ही सभागृहात चांगलाच तापला आहे. राज्यसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी खासदारांच्या निलंबनाचा मुद्दा उपस्थित केला. ही कारवाई नियमांविरुद्ध असल्याचे सांगून त्यांनी निलंबन मागे घेण्याची विनंती केली, जी राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनी फेटाळून लावली. निलंबित केलेले खासदार आजपासून संसदेतील गांधी पुतळ्यासमोर आंदोलन करणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारने त्यांचे निलंबन मागे घेतले नाही, तर विरोधक संपूर्ण अधिवेशनावर बहिष्कार टाकू शकतात. पावसाळी अधिवेशनात या खासदारांनी असभ्य वर्तन केले होते. सदनामध्ये तोडफोड करणे, पादुकांवर कागद फेकणे, टेबलावर नाचणे, मार्शलसोबत असभ्य वर्तन करणे असे आरोप करण्यात आले होते.
हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज दुपारी ३ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखाली आठ विरोधी नेत्यांनी राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांची भेट घेतली आणि त्यांना १२ खासदारांचे निलंबन मागे घेण्याबाबत पुनर्विचार करण्याची विनंती केली. सभागृहाच्या निलंबित सदस्यांनी माफी मागितल्याशिवाय हे शक्य नाही, असे सभापती नायडू यांनी सांगितले आहे.
राज्यसभेतील 12 खासदारांच्या निलंबनावरून विरोधी पक्षनेते राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या कार्यालयात आणखी एक बैठक घेत आहेत. मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, आज आपण सभापतींची भेट घेतली आणि निलंबित केलेल्या 12 सदस्यांना सभागृहात परत घेण्याची विनंती केली. गेल्या अधिवेशनात घडलेल्या प्रकाराला उचलून धरून सदस्यांना पुन्हा निलंबित करणे बेकायदेशीर व नियमाविरुद्ध आहे असे खरगे म्हणाले.
Edited By: Pravin Dhamale
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.