विरार : विरारमधून (Virar) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीला घाबरवण्याच्या नांदात एका पतीला आपला जीव गमवावा लागलाय. पत्नीने उसणे घेतलेले पैसे परत केले नाही म्हणून पतीने गळफास लावून आत्महत्या करण्याचा बनाव केला. मात्र, गळ्याला खरोखरच फास लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी विरार पोलिसांनी (Police) अकस्मात मृत्युची नोंद केलीये. (Virar News Today)
भगवान रामजी शर्मा (वय ३५) असं मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. विरार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत भगवान रामजी शर्मा आणि त्याची पत्नी चांदणीदेवी (२५) विरार पूर्वेतील वीर सावरकर मार्ग परिसरातील लक्ष्मी निवास या ठिकाणी ७ दिवसापुर्वी राहायला आले होते. हे दोघेही भाईंदर येथील एका खासगी कंपनीत काम करत होते.
भगवान शर्मा यांच्याकडून त्यांच्या पत्नी चांदणीदेवी यांनी नवीन कपडे घेण्यासाठी २००० रुपये उसणे घेतले होते. यातील १५०० रुपये त्यांनी परत केले. ५०० रुपये नसल्याने ते लवकरच देईल असं चांदणीदेवी यांनी पती भगवान यांना सांगितले. याचा राग आल्याने भगवान यांनी चांदणीदेवी यांच्यासोबत भांडण केले. (Virar Latest Marathi News)
उर्वरित ५०० रुपये मला आताच दे अन्यथा आत्महत्या करेन असं म्हणत भगवान यांनी चांदणीदेवी यांनी आणलेले कपडे फाडून टाकले. तसेच रागाच्या भरात भगवान यांनी बेडरुममध्ये जाऊन आपण गळफास घेत असल्याचा बनाव केला. मात्र, दिखावा करत असताना गळ्याला फास लागून त्यांचा मृत्यू झाला.
बराच वेळ होऊनही पती दरवाजा उघडत नसल्याने चांदणीदेवी यांनी दरवाजा ठोठावला. आतून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी शेजारील व्यक्तींना याबाबत माहिती दिली. शेजारच्यांनी दरवाजा तोडला असता, भगवान यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. याप्रकरणी विरार पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Edited By - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.