Thackeray Vs Shinde: राज्यातील सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आज पूर्ण झाली आहे. शिंदे-ठाकरे गटाचा युक्तीवाद पूर्ण झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला आहे. आता न्यायालय कुणाचाही युक्तिवाद ऐकणार नाही. जवळपास ९ महिने ही सुनावणी सुरु होती. त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालय काय निकाल देणार याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील ठाकरे सरकार कोसळले होते. शिंदे यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसह भाजपच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले होते. सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी ५ याचिका दाखल झाल्या. या याचिकांमध्ये विधानसभा उपाध्यक्ष शिंदे गटातील १४ आमदारांच्या बरखास्तीची नोटीस बजावली होती.
आज शेवटच्या दिवशी ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल यांनी सुनावणी सुरू केली. यानंतर मनुसिंघवी यांनी युक्तिवाद केला. त्यानंतर राज्यपाल आणि शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी, हरीश साळवे आणि नीरज कौल यांच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला. यानंतर पुन्हा एकदा कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाच्या वतीने युक्तिवाद केला. (Latest Marathi News)
युक्तीवाद संपवताना कपिल सिब्बल काहिसे भावूक झालेले दिसले. सिब्बल म्हणाले की, या न्यायालयाचा इतिहास संविधान आणि लोकशाहीचा रक्षक म्हणून राहिला आहे. न्यायालयाने हस्तक्षेप केला नाही तर देशातील लोकशाही संपुष्टात येईल, असं सांगत कपिल सिब्बल यांनी राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांचे सरकार स्थापन करण्याचा घेतलेला निर्णय रद्द करण्याची मागणी केली.
न्यायालयाच्या इतिहासातील हे असे प्रकरण आहे ज्यावर लोकशाहीच्या भवितव्याचा निर्णय होणार आहे. न्यायालयाने मध्यस्थी केली नाही तर लोकशाही धोक्यात येईल, याची मला पूर्ण खात्री आहे. कारण आगामी काळात कोणतेही सरकार पुन्हा टिकू दिले जाणार नाही. तुम्ही राज्यपालांचा आदेश रद्द कराल या आशेने मी माझा युक्तिवाद संपवतो, असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.