रामनाथ दवणे
मुंबई: शिवसेनेतील बंडाळीनंतर माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख पुन्हा जोमाने कामाला लागले आहेत. मुंबईत मातोश्रीवर नगरसेवक, पदाधिकारी, माजी आमदार, जिल्हा संपर्कप्रमुख यांच्या बैठकांचा सपाटा सुरू झाला आहे. उद्धव ठाकरे यांनी आज, मंगळवारी दुपारी मातोश्री या निवासस्थानी माजी आमदारांची बैठक बोलावली. संघर्षाची तयारी ठेवा, सगळ्यांना पुन्हा लढायचं आहे, असं उद्धव ठाकरे यांनी उपस्थित माजी आमदारांना सांगितले. यावेळी त्यांनी पुन्हा 'एकला चलो रे'चा नारा दिला.
शिवसेनेत (Shivsena) बंडखोरी झाल्यानंतर जवळपास ४० हून अधिक आमदार शिंदे गटात सहभागी झाले आहेत. दुसरीकडे, राज्यभरातील अनेक ठिकाणचे पदाधिकारी, नगरसेवक हे शिंदे गटात सहभागी झाले आहेत. शिवसेनेतील ही गळती अद्याप थांबलेली नाही. दुसरीकडे, शिवसेनेला पुन्हा उभारी मिळवून देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रयत्न करत आहेत. मुंबईतील मातोश्रीवर ठिकठिकाणचे नगरसेवक, पदाधिकारी, जिल्हा संपर्कप्रमुख, तालुकाप्रमुख, माजी आमदार आदींच्या बैठकांचा सपाटा सुरू आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज, बुधवारी दुपारी माजी आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला ३० ते ३५ माजी आमदार उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी माजी आमदारांना तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत.
यावेळी ठाकरेंनी पुन्हा एकला चलो रेचा नारा दिला. संघर्षाची तयारी ठेवा, आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा लढायचं आहे. आता आपली वारंवार बैठक होणार आहे. तुमचे मूळ प्रश्न आम्ही सोडवणार आहोत, असा विश्वासही त्यांनी उपस्थित माजी आमदारांना दिला.
द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा
राष्ट्रपतिपदाची निवडणूक होत आहे. (President Election) भाजपप्रणित एनडीएकडून द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, अशी विनंती अनेक खासदारांनी उद्धव ठाकरेंना केली होती. उद्धव ठाकरेंनीही मुर्मू यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती. आज झालेल्या बैठकीत त्यांनी याबाबत घोषणा केली आहे.
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार मुर्मू यांना पाठिंबा देणार असल्याचं त्यांनी यावेळी जाहीर केलं. याआधीही बाळासाहेब ठाकरे यांनी यूपीएच्या उमेदवार प्रतिभाताई पाटील यांना पाठिंबा दिला होता.
...अन् राजनाथ सिंह यांच्यावर भडकलो - ठाकरे
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेने पाठिंबा जाहीर केला आहे. तसं उद्धव ठाकरे यांनी यावेळी जाहीर केलं. तसेच ठाकरे यांनी यावेळी राजनाथ सिंह यांनी फोन केल्याचं सांगितलं. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी राजनाथ सिंह यांनी फोन केला होता. त्यावेळी त्यांच्यावर भडकलो होतो, असे ठाकरे यांनी या बैठकीत सांगितले. राजनाथ फोनवर 'अस-सलाम-अलैकुम' असं म्हणाले होते. त्यावेळी मी त्यांच्यावर भडकलो होतो, मग त्यांनी जय श्री राम म्हटलं होतं, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.