मुंबई : राज्यात सत्तासंघर्षानंतर भाजप आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यातील वाद शिगेला पोहचला आहे. सातत्याने आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे मैत्रीचा हात पुढे केला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
कटुता संपवा असे आवाहन ठाकरे गटाकडून फडणवीस यांना करण्यात आलं आहे. काय होईल असे जर-तर वगैरे राजकारणात चालत नाही. पण महाराष्ट्राची एकोप्याची परंपरा कायम राहावी या फडणवीसांच्या मताशी आम्ही सहमत आहोत.
नेपोलियन, सिकंदरही कायम राहिले नाहीत. राम-कृष्णही आले आणि गेले. तेथे आपण कोण? फडणवीस, तुमच्या मनात आलेच आहे तर कटुता संपविण्याचा विडा उचलाच! लागा कामाला!! असे आवाहन सामना अग्रलेखातून फडणवीस यांना करण्यात आलं आहे.
पाहा व्हिडीओ -
सामना (samana) मधून देवेंद्र फडणवीस यांनी ऐन दिवाळीत केलेल्या सामोपचाराच्या वक्तव्याबद्दल अभिनंदन केलं आहे. तर पुढे लिहलं आहे की, फडणवीस यांचा मूळ स्वभाव हा सामोपचाराने मिळून मिसळून वागण्याचाच होता. पण सत्ता गेल्यामुळे ते बिघडले. सत्ता येते व जाते. माणसाने मूळ स्वभाव बदलण्याची गरज नाही.
विजयानंतर आनंद होत असला तरी उन्माद चढणे हे प्रौढत्वाचे लक्षण मानले जात नाही. फडणवीस यांच्यात नव्या सत्तांतरापासून प्रौढपणा आला असल्याचे जाणवू लागले आहे. शिवाय फडणवीसांनी मांडलेल्या मुद्दायवर महाराष्ट्राने विचार करायला हवा. महाराष्ट्राच्या राजकारणात कधी नव्हे एवढी कटुता आली आहे, हे नाकारता येणार नाही, असे फडणवीस यांनी कबूल केले आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात फक्त कटुता नव्हे तर सूडाच्या राजकारणाचे विषारी प्रवाह उसळत आहेत व या प्रवाहाचे मूळ भाजपच्या अलीकडच्या राजकारणात आहे. पण त्याबाबत फडणवीस यांच्यासारख्या नेत्यांना आता खंत वाटू लागली असेल तर त्या विषाचे अमृत करण्याचे कामही त्यांनाच करावे लागेल असा टोला वजा आवाहन देखील सामनातून करण्यात आलं आहे. त्यामुळे आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून फडणवीस यांना साद घातल्याने पुन्हा नव्याने युती होणार का अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.