
मुंबईमध्ये फक्त मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची तळागाळत ताकद आहे. त्यामुळे निवडणुकीच्या कामाला लागा असे मनसे अध्यक्ष आदेश राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. मुंबईतील मनसेच्या विभाग अध्यक्षांची आज बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मुंबईतील प्रत्येक मतदार यादी तपासण्याचे आदेश राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. राज ठाकरे यांनी आजच्या बैठकीमध्ये आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंघाने पदाधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना देत कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.
मनसेच्या बैठकीमध्ये राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना मनसे गटाध्यक्षांसह इतर पदाधिकाऱ्यांनी विशेष जबाबदारी घेऊन निवडणुकीच्या कामाला लागावे, असे आदेश दिले. तसंच, मुंबईत मनसे आणि ठाकरेंची शिवसेना या दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांची तळागाळात ताकद आहे. मनसे आणि शिवसेनेशिवाय इतरांची मुंबईत ताकद नाही असे म्हणत राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना प्रत्येक मतदार यादी व्यवस्थित तपासा असे आदेश दिलेत.
या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना दादर कबुतरखाना मुद्दा, चिकन-मटण बंदी या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, 'सध्या मुंबईतील दादर येथील कबुतरखान्यावरून जो वाद सुरु आहे त्याबाबत माननीय उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे त्यानुसार सर्वानी वागलं पाहिजे. आणि न्यायालयाने जर बंदी घातली आहे तर जैन मुनींनी पण त्याचा विचार केला पाहिजे. कबुतरांमुळे काय रोग होऊ शकतात हे अनेक डॉक्टरांनी सांगितलं आहे तरीही कबुतरांना खायला घातलं जाणार असेल तर पोलिसांनी खायला घालणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे. जेंव्हा मुळातच न्यायालयाचा आदेश असताना आंदोलन झालं तेंव्हाच सरकारने कारवाई करायला पाहिजे होती.'
राज ठाकरे यांनी यावेळी यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावर देखील टीका केली. ते म्हणाले की,'त्यात राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा सहभागी झाले. कोर्टाचा आदेश काय आहे हे लोढांना माहित नाही का? लोढांनी हे विसरू नये की ते राज्याचे मंत्री आहेत कुठल्या धर्माचे नाहीत. काल मराठी लोकांनी आंदोलन केली तेंव्हा त्यांची धरपकड झाली, पत्रकारांना मारहाण झाली. सरकारचं नक्की काय सुरु आहे हेच कळत नाहीये. निवडणुका तोंडावर आल्या आहेत म्हणून समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आधी हिंदी सक्ती करून पाहिली आता कबुतरांचा विषय आणला.'
तसंच, '१५ ऑगस्टला कल्याण-डोंबिवली महापालिकेने कत्तलखाने बंद ठेवण्याचा आणि मांसविक्री बंद करण्याचा आदेश दिलाय. मुळात कोणी काय खावं हे ठरवण्याचा अधिकार महापालिकेला कोणी दिला? मी माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगितलं आहे की ही बंदी पाळू नका. स्वातंत्र्यदिन म्हणून १५ ऑगस्ट साजरा करायचा आणि त्या दिवशी खायचं स्वातंत्र्य नाही हा काय प्रकार आहे?', असा सवाल राज ठाकरे यांनी केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.