हिंदूविरोधी सरकार वाचवण्यासाठी आमदारांना साद; एकनाथ शिंदेंचा मुख्यमंत्र्यावर निशाणा

'एका बाजूला आपल्या पुत्राने व प्रवक्त्याने वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना नाल्याचीघाण, रेडा, कुत्रे, जाहील व मृतदेह म्हणायचे, त्यांचा बाप काढायचा.'
Maharashtra Political Crisis Eknath Shinde Vs Uddhav Thackeray News
Maharashtra Political Crisis Eknath Shinde Vs Uddhav Thackeray NewsSaam TV

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना भावनिक आवाहन केलं होतं. मात्र त्यांच्या या आवाहानबद्दल एकनाथ शिंदे यांनी शंका उपस्थित केली आहे. याबाबत त्यांनी एक ट्विट केलं आहे. शिंदे (Eknath Shinde) यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, 'एका बाजूला आपल्या पुत्राने व प्रवक्त्याने वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना डुकरं, नाल्याचीघाण, रेडा, कुत्रे, जाहील व मृतदेह म्हणायचे, त्यांचा बाप काढायचा.

तर दुसऱ्या बाजूला मात्र हिंदूविरोधी 'मविआ'सरकार वाचवण्यासाठी याच आमदारांना समेटाची हाक द्यायची,याचा अर्थ काय?' असा प्रश्न उपस्थित करत शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे.

एकनाथ शिंदे यांनी बडखोरी केल्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे. त्यामुळे सरकार टिकवायचं असेल तर त्या बंडखोरांना परत आणावं लागणार आहे. मात्र, सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता बंडखोर मागे यायच्या मनस्थितीत दिसत नाहीत. मात्र, याच बंडखोरांना अजून वेळ गेलेली नाही परत या अशी भावनिक साद मुख्यमंत्र्यांनी घातली आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, 'आपण मागील काही दिवसांपासून गुवाहाटी (Guwahati) येथे अडकून पडला आहात. आपल्याबाबत रोज नवी माहिती समोर येत आहे. आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत. शिवाय आपण आजही मनाने शिवसेनेत आहात .आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो. कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही , माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे, 'आपण या माझ्या समोर बसा , शिवसैनिकांच्या (Shivsainik) आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा , यातून निश्चित मार्ग निघेल. कोणाच्याही कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका. अशी भावनिक साद मुख्यमंत्र्यांनी बंडखोर आमदारांना घातली होती.

याच पार्श्वभूमीवर आता एकनाथ शिंदे यांनी एक ट्विट केलं असून त्यांनी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. कारण एकीकडे सेनेचे प्रवक्ते आपल्या आमदारांना मृतदेह, डुकरं असं म्हणून हिनवत आहेत. तर आदित्य ठाकरे हे बंडखोरांना नाल्याची घाण असे म्गणत आहेत. शिवाय बंडखोरांचा बाप देखील काढत आहेत याचा अर्थ काय? असा सवाल शिंदे यांनी उपस्थित केला आहे.

शिवाय उद्धव ठाकरे हे भावनिक आवाहन केवळ हिंदूविरोधी मविआसरकार वाचवण्यासाठी करत असल्याचं देखील त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे आता ठाकरेंच्या भावनिक आवाहानाला देखील ही बंडाळी केलेले आमदार जुमानत नसल्याचं दिसून येत आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com