
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना युतीबाबत प्रस्ताव पाठवला. त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून यासंदर्भात प्रतिक्रिया येत आहेत. मनसे आणि ठाकरे गटाच्या काही कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांची राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे अशी इच्छा आहे. यासंदर्भात अनेक ठिकाणी बॅनरबाजी देखील करण्यात आली आहे. अशामध्ये आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा यासंदर्भात आपले मत मांडले आहे. 'भूतकाळात काय झाले ते पाहू नका, भविष्याचा विचार करा. महाराष्ट्राचा विचार करा.', असा सल्ला संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना दिला आहे.
संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे याबाबत आपले मत मांडले. त्यांनी सांगितले की, 'त्याच्यामुळे कोणाला वाईट वाटले आहे का? सन्माननीय उद्धव ठाकरे सन्माननीय राज ठाकरे यांनी एकत्र यावे महाराष्ट्राचे सूत्र हातात घेतली पाहिजे. आतापर्यंत महाराष्ट्राच्या भावना याच होत्या. महाराष्ट्राच्या मनात काय आहे ही भावना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनी व्यक्त केली आहे.'
संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर टीका करणाऱ्यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत, ते म्हणाले की, 'जेव्हा दोन प्रमुख नेते आपले मत मांडतात तेव्हा ते आपण गांभीर्याने घेतले पाहिजे आणि पुढे जायला पाहिजे. काही लोकांना त्याच्याविषयी वेदना होणार आहेत. उद्धव आणि राज ठाकरे एकत्र झाले किंवा राजकारण एकत्र केलं तर काही लोकांना वेदना होणार आहेत. त्यांच्या पोटात मळमळ होत असेल. त्याकडे आम्ही दुर्लक्ष करत आहोत. कारण त्या लोकांना कायम शेतात जावं लागेल. संघाच्या शाखेत जावे लागेल अशी भीती त्यांना आहे.'
संजय राऊत यांनी पुढे सांगितले की, 'महाराष्ट्र हा कायम ठाकरेंवर प्रेम करणारा आहे. पिढ्या बदलल्या पण हे प्रेम काही कमी होत नाही. त्यामुळे अनेकांना भीती वाटत असेल म्हणून त्यांच्या पोटातून काही मळमळ बाहेर पडत असेल त्यांच्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो. आम्ही सकारात्मक दृष्टीने याकडे पाहतो. आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी स्थापन करण्यापूर्वी एकमेकांवर प्रचंड टीका करत होतो. पण आम्हाला एकत्र यायचे होते तेव्हा आम्ही भूतकाळ पाहिला नाही. जेव्हा राज्याच्या आणि देशाच्या हितासाठी हातमिळवणी करतो तेव्हा भूतकाळ कशासाठी पाहावा. आम्हाला महाराष्ट्राचे भवितव्य घडावायचे आहे हे दोन नेत्यांमध्ये ठरले आहे. आमचा दृष्टीकोन सकारात्मक आहे.'
तसंच, 'राज ठाकरे यांनी स्वत: एकत्र येण्याबाबतच्या विषयावर मत व्यक्त केले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मत व्यक्त केल्यावर इतरांनी यात पडण्याची गरज नाही. राज ठाकरे यांच्या मनात काही विचार पक्के असल्याशिवाय एकत्र काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली नसती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील ही भूमिका मांडली. आमच्या पक्ष प्रमुखांकडूनही संदेश दिला गेला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी फक्त संकेत दिल्यावर राज्यात इतकी आग लागली आहे. जर ते एकत्र आले तर काय होईल?' असं मत देखील संजय राऊत यांनी व्यक्त केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.