कार्यकर्त्यांना जमवायचं कसं? जितेंद्र आव्हाडांच्या पदाधिकाऱ्यांचे जप्त केलेले मोबाईल पोलिसांनी परत दिलेच नाहीत
रुपाली बडवे, मुंबई
NCP MLA Jitendra Awhad News: राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केली. आव्हाड यांनी आज, १४ नोव्हेंबरला सकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी एक ट्विट केलं. या ट्विटमधून त्यांनी राजीनामा देणार असल्याचं जाहीर केलं आहे. आव्हाडांच्या या घोषणेनं राजकीय वर्तुळात (Politics) खळबळ उडाली आहे. मात्र, राजीनाम्याची घोषणा केल्यानंतरही आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नाद या बंगल्यासमोर शुकशुकाटच आहे. आव्हाडांच्या घरासमोर हवे तेवढे कार्यकर्ते जमले नाही. याचं कारण म्हणजे, अनेक पदाधिकाऱ्यांचे मोबाईल पोलिसांनी जप्त केले होते, यामुळे आव्हाडांच्या कार्यकर्त्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. (Jitendra Awhad Latest News)
आव्हाडांच्या ११ कार्यकर्त्यांचे मोबाईल जप्त
हर हर महादेव चित्रपटाला आव्हाडांनी विरोध केला. ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी विवियाना मॉलमध्ये जाऊन शो बंद पाडला होता. त्यावेळी कार्यकर्त्यांसोबत प्रेक्षकाची झटापट झाली होती. एका प्रेक्षकाला मारहाण केल्याचंही व्हिडिओमध्ये दिसत होतं. या प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांना ठाण्यातील वर्तक पोलिसांनी आव्हाडांना अटक केली होती. सोबतच आव्हाडांच्या ११ पदाधिकाऱ्यांचे मोबाईल फोन जप्त केले होते, जे त्यांनी पोलिसांनी अद्यापही परत केलेले नाही. कार्यकर्त्यांचे संपर्क क्रमांक मोबाईलमध्ये सेव्ह होते, मात्र पोलिसांनी मोबाईल जप्त केले आहेत. त्यामुळे या कार्यकर्त्यांना गोळा करण्यासाठी पदाधिकाऱ्यांना अनेक अडचणी येत आहेत. (Latest Marathi News)
मोबाईल नसल्याने पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्त्यांशी संपर्क होईना
आव्हाडांच्या ११ पदाधिकाऱ्यांचे मोबाईल फोन पोलिसांनी जप्त केल्याने त्यांची पंचाईत झाली आहे. कारण, घरासमोर कार्यकर्त्यांची गर्दी जमवण्यासाठी कार्यकर्त्यांने संपर्क क्रमांक हे सर्व मोबाईलमध्ये होते. आता मोबाईल जप्त असल्याने पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्त्यांशी संपर्क होण्यासाठी अनेक अडचणी येतायत. यामुळे आव्हाडांनी राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतरही आव्हाडांच्या 'नाद' या बंगल्यासमोर हवा तशी गर्दी जमलेली नाही. (Latest Marathi News)
आव्हाडांविरोधात दोन गुन्हे दाखल
'हर हर महादेव' या चित्रपटात इतिहासाची मोडतोड करण्यात आल्याचा आरोप करत आव्हाडांनी या चित्रपटाचे काही शो बंद पाडले होते. त्यांनतर आव्हाड यांच्याविरोधात ८ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर काल, रविवारी कळवा येथील एका पुलाच्या लोकार्पण कार्यक्रमादरम्यान आव्हाड यांनी विनयभंग केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. याबाबत आव्हाडांविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.