वेदांता गुजरातला नक्की कशामुळे गेला? भाजपने सांगितली कारणं, ठाकरे सरकारवरच ढकललं प्रकरण

'महाविकास आघाडी सरकारने सर्व परवानग्या दिल्या होत्या का? सर्व कंपनीला संमती झाली होती का? पायाभरणी, भूमिपूजन झाले होते का? '
Vedanta Foxconn Shivsena Vs BJP
Vedanta Foxconn Shivsena Vs BJPSaam TV

मुंबई: राज्यभरात वेदांता फॉक्सकॉन (Vedanta Foxconn) प्रकल्पावरुन राजकारण चांगलचं तापलं आहे. सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारला कोंडीत पकडण्यासाठी युवासेनेच्या वतीने आज राज्यभरात आंदोलनं केली जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसने देखील हा प्रकल्प गुजरातला गेल्यावरुन सत्ताधाऱ्यांवर टीकेंचा भडीमार सुरु केला आहे.

याच सर्व पार्श्वभूमीवर भाजपने देखील आता या प्रकल्पाबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. शिवाय राज्यात सध्या वेदांता प्रकल्पाच्या मुद्यावरुन शिवसेना (Shivsena) जनतेमध्ये भ्रम पसरविण्याचं काम करत असल्याचा आरोप मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना शेलार म्हणाले, 'वेदांता प्रकल्पाच्या मुद्यावरुन काही लोकांना राजकारणाचा उत आला आहे. महाराष्ट्रातील जनतेमध्ये भ्रम पसरवण्याचे काम पेंग्विनसेना करत आहे. काही मुखपत्रांनी त्यावर अग्रलेखही लिहिले आहेत. मात्र, माझा सवाल थेट पेंग्विन सेनेच्या प्रमुखांना आहे. आपण लिहलेल्या अग्रलेखात हा प्रकल्प गुजरातमध्ये खेचून नेला असा उल्लेख केला आहे. मग जर या पद्धतीचा आरोप असेल तर त्याची उत्तर आपल्याकडूनच अपेक्षित आहेत.

पाहा व्हिडीओ -

शिवाय हा प्रकल्प खेचून नेला याचा दुसरा अर्थ असा होतो की, हा प्रकल्प महाराष्ट्रात होता, तर तो सुरू कधी झाला? आपल्या महाविकास आघाडी सरकारने सर्व परवानग्या दिल्या होत्या का? सर्व कंपनीला संमती झाली होती का? पायाभरणी, भूमिपूजन झाले होते का ? जिथे तो प्रकल्प प्रस्थापित होत होता तिथे जागेचा ताबा घेण्यात आला होता का ? किंवा सरकारने करारनामा केला होता का ? आपण हा प्रकल्प खेचला म्हणता तर या प्रश्नाची उत्तर अपेक्षित आहेत. असं म्हणत शेलार यांनी शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकारवर प्रश्नांचा भडीमार केला.

ते पुढे म्हणाले, केवळ आपला मुख्यमंत्री झाला नाही, बाळासाहेबांचा शिवसैनिक आणि सर्व सामान्य व्यक्ती मुख्यमंत्री झाला म्हणून बदनाम केलं जातं आहे. महाराष्ट्र या भूलथापांना बळी पडणार नाही. शिवाय अनिल अग्रवाल यांनी ट्विट केल्यानंतर दोन स्वतंत्र मुद्दे समोर आलेत. ते म्हणत आहेत 'आम्ही प्रकल्प महाराष्ट्रात करणार आहोत मग हे आरोप कसे म्हणतात' दोन वर्ष याबाबतच्या चर्चा सुरू असल्याचे अनिल अग्रवाल म्हणत आहेत.

Vedanta Foxconn Shivsena Vs BJP
'वेदांता'नंतर महाराष्ट्राला दुसरा धक्का; आणखी एक मोठा प्रकल्प गुजरातला!

मग पेंग्विनसेना प्रमुख असे आरोप कसे काय करू शकते. दोन वर्ष चर्चा झाल्यानंतर सुद्धा जागेचा करारनामा झाला नसेल किंवा इतर गोष्टी झाल्या नसतील, तरी सुद्धा पेग्विंन सेना दोन वर्ष काहीही करू शकली नाही. या मधल्या काळात असे काय झालं की हा प्रकल्प रखडला गेला? या प्रकल्पाबाबत चौकशी झाली पाहिजे खोटे बोलणारे उघडे पडले पाहिजेत असंही शेलार यावेळी म्हणाले.

तसंच पेंग्विन सेनेचा थयथयाट यासाठी सुरू आहे की, याकूब मेमनच्या थडग्यात रंगलेले हाथ लपवण्यासाठी हे विषयांतर करत आहेत. ज्या दारू विक्रेत्या कंपनींना आपण तातडीने परवानगी दिली. तेवढ्या तातडीने वेंदाता प्रकल्पाला परवानगी का दिली नाही?

तसंच या पद्धतीचे खोटे भ्रम पसरवून उद्धवजींच्या सेनेले गुजराती माणसाबद्दल शत्रूत्व निर्माण करायचं आहे. यातून दोन समाजांमध्ये द्वेष निर्माण करायचा आहे. जे दोन प्रकल्प गेल्याची बोंब ठोकताय ते आल्याबाबतचे पुरावे द्या; असं म्हणत शेलार यांनी सेनेवर हल्लाबोल करत आपली बाजू मांडत हे सर्व प्रकरण शिवसेनेवर ढकललं आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com