ऊन वाढू लागल्यानंतर मराठवाड्यात पाणी टंचाई दिवसेंदिवस अधिक जाणवू लागली आहे. मराठवाड्यातील 497 गावे आणि 150 वाड्यांना सध्या 763 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये सर्वाधिक टँकरची संख्या ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे.
छत्रपती संभाजीनगर खालोखाल जालना जिल्ह्यात 235 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यंदा मराठवाड्याकडे पावसाने पाठ फिरवल्यामुळे प्रचंड दुष्काळाचे सावट असल्याने खरीप हंगामात पावसाने दगा दिल्यामुळे पिकेही वायाला गेली. यामुळे पावसाचे प्रमाण कमी असल्याने जवळपास 1109 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून पाच जिल्ह्यात जवळपास 763 टँकर सुरू करण्यात आले आहे.
दरम्यान ऐन उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच अशी परिस्थिती आहे. तर दुसरीकडे जायकवाडी धरणातला पाणीसाठा देखील केवळ 22 टक्के शिल्लक आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये ही परिस्थिती आणखी गंभीर होण्याची दाट शक्यता आहे. सध्या मराठवाड्यातील संभाजीनगर जिल्ह्यात 385 टँकरने पाणीपुरवठा केला जातोय. त्यापाठोपाठ जालना 235, बीड 93, लातूर 8, धाराशिव 42 अशी टँकरची संख्या आहे.
परभणी जिल्हात दुष्काळाचे सावट
परभणी जिल्हात देखील आतापासूनच दुष्काळाने शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांना जनावरांसाठी पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी दुभत्या गायी / म्हशी/शेळी औताला असलेल्या बैल जोड्या बाजारात विकण्यासाठी काढल्या आहेत.
शेतकरी तसेच व्यापाऱ्यांना आपली जनावरे बाजारात आणण्यासाठी वाहतुकीचा खर्च तसेच बाजारामध्ये जनावरांच्या चाऱ्याचा खर्च करावा लागतो पण बाजारात कोणीही ग्राहक नसल्याने हा खर्च शेतकरी व्यापाऱ्याच्या माथी पडतो. जिल्हात तापमानाचा पारा वाढला असून खरीप व रब्बी शेतकऱ्यांच्या हाती काही लागले नाही त्यामुळे आपले गोधन विक्रीस आणत आहेत. पण ग्राहकच नसल्याने तापमानात दिवसभर उभे राहून खर्च करत आपली जनावरे परत घरी घेऊन जावी लागत आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.