मुंबई : राज्यातील मोठे प्रोजेक्ट परराज्यातील गेल्यानं राजकारण चांगलंच तापलं होतं. मात्र महाराष्ट्रात केंद्र सरकारने सुमारे दोन लाख कोटींहून अधिक किमतीचे सुमारे 225 प्रकल्प मंजूर केले आहेत, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी दिली आहे. ते आज राज्य सरकारने आयोजित केलेल्या महाराष्ट्र रोजगार मेळाव्यात बोलत होते.
महाराष्ट्रात केंद्र सरकारने सुमारे दोन लाख कोटींहून अधिक किमतीचे प्रकल्प मंजूर केले आहेत. या प्रकल्पांचे काम एकतर सुरू आहे किंवा लवकरच सुरू होणार आहे. महाराष्ट्रात रेल्वेसाठी 75 हजार कोटी रुपये आणि आधुनिक रस्त्यांसाठी 50 हजार कोटी रुपयांचे प्रकल्प मंजूर झाले आहेत. जेव्हा सरकार पायाभूत सुविधांवर एवढी मोठी रक्कम खर्च करते, तेव्हा त्यातून लाखो नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतात, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. (Latest Marathi News)
यावेळी पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही अभिनंदन केले. अल्पावधीतच रोजगार मेळाव्याच्या आयोजनावरून महाराष्ट्र सरकार युवकांना रोजगार देण्याच्या दृढ संकल्पाने वाटचाल करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आगामी काळात महाराष्ट्रातही अशा रोजगार मेळाव्यांचा अधिक विस्तार होईल याचा मला आनंद आहे. महाराष्ट्राच्या गृह विभागात हजारो पोलिस कॉन्स्टेबलची भरती केली जाईल आणि ग्रामीण विकास विभागातही भरती मोहीम राबवली जाणार आहे याची माहितीही पंतप्रधान मोदींनी दिली.
मोदी पुढे म्हणाले की, बदलत्या काळात नोकरीचे स्वरूप ज्याप्रकारे झपाट्याने बदलत आहे, त्याचप्रमाणे सरकारही सातत्याने विविध प्रकारच्या नोकऱ्यांच्या संधी निर्माण करत आहे. स्वयंरोजगारासाठी हमीशिवाय कर्ज देणाऱ्या मुद्रा योजनेअंतर्गत सरकारने तरुणांना 20 लाख कोटी रुपयांहून अधिक मदत दिली आहे. महाराष्ट्रातील तरुणांनी याचा मोठा फायदा घेतला आहे. सरकार स्टार्ट-अप्स, लघुउद्योगांना - MSME शक्य ती सर्व आर्थिक मदत देत आहे, जेणेकरून तरुणांना त्यांची प्रतिभा दाखवण्याची पूर्ण संधी मिळेल.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.