Sanjay Raut : "उर्फी प्रकरणात भाजपचं वस्त्रहरण, अंजली प्रकरणात ढोंग उघडं... "; संजय राऊतांची भाजपवर टीका

उर्फीच्या वादात भाजपचेच वस्त्रहरण झाले आहे, अशा कडक शब्दांत संजय राऊत यांनी भाजप नेते आणि चित्रा वाघ यांच्यावर टीका केली आहे.
Sanjay Raut
Sanjay RautSaam TV

Sanjay Raut : महाराष्ट्रात उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद वाढतच चालला आहे. चित्रा वाघ यांच्या प्रत्येक टीकेवर उर्फी सडेतोड उत्तर देताना दिसत आहे. मात्र यामुळे भाजप महिला आघाडी अधिक आक्रमक झाली आहे. उर्फी दिसेल तिथे तिला थोबडवेल, असे वक्तव्य चित्रा वाघ यांनी केले आहे. अशात आता या प्रकरणात संजय राऊतांनी सामनामधून भाजपचा चांगलाच समाचार घेतला आहे. (Latest Maharashtra Politics)

"मुंबईत उर्फी जावेदने भारतीय जनता पक्षाला कामास लावले आहे. तिचे तोकडे कपडे, 'पठाण' चित्रपटातील भगवी बिकिनी यावर सध्या भाजपच्या महिला आघाडीचे आंदोलन सुरू आहे. पण दिल्लीच्या अंजलीला भाजपच्याच पदाधिकाऱ्याने चिरडले यावर कोणीही बोलत नाही. उर्फीच्या वादात भाजपचेच वस्त्रहरण झाले आहे." , अशा कडक शब्दांत संजय राऊत यांनी भाजप नेते आणि चित्रा वाघ यांच्यावर टीका केली आहे.

रोखठोक सदरात संजय राऊत पुढे म्हणाले की, " महाराष्ट्राचे राजकारण सध्या पूर्ण रसातळाला गेले आहेत. ते इतकं की राज्यातले सगळे प्रश्न संपले आहेत. कोण्या एका उर्फी जावेद या नवख्या नटीच्या तोकड्या कपड्यांवरून भारतीय जनता पक्षाच्या महिला नेत्या बोलू आणि डोलू लागल्या आहेत. उर्फी जावेद या कालपर्यंत अनोळखी असलेल्या नटीने मुंबईच्या रस्त्यावर कमी कपड्यात शुटिंग केलं. त्यामुळे हिंदू संस्कृतीचे वस्त्रहरण झाले असे भारतीय जनता पक्षाला वाटते आणि त्यांनी त्या उर्फीविरूद्ध तशी मोहीम सुरू केली. या सगळ्याचा परिणाम असा झाला की उर्फीला प्रसिद्धी मिळाली आणि तिचा भाव वधारला. त्यामुळे संस्कृतीचे वस्त्रहरण कुणी केले? तर ते भाजपानेच केलं. उर्फीही भाजपाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांच्यावर तुटून पडली. हे सगळं टाळता आलं असतं. संस्कृतीच्या नावाखाली भाजपा जी फौजदारी करत आहे ती अनावश्यक आहे."

उर्फी जावेद प्रकरणात भाजपवर सगळे उलट फिरले

"उर्फी प्रकरणात जे मॉरल पोलिसिंग झाले ते भाजपावर उलटले आहे. उर्फी कोण? ती काय करते? या भानगडीशी सामान्य जनतेला काहीही पडलेले नाही. उर्फीने तोकडे कपडे घातल्याने बलात्कार वाढतील हा दावा हास्यास्पद आहे. महिलांवरचे अत्याचार ही विकृती आहे. ही विकृती कायद्यावरही मात करत असते. महाराष्ट्रातील भाजपा मुंबईत उर्फी प्रकरणावर लढा देत असताना तिकडे देशाच्या राजधानीत म्हणजे दिल्लीत जे घडलं ते धक्कादायक होतं."

पुढे अंजली विषयी संजय राऊत यांनी म्हटले आहे की, " अंजली सिंह या मुलीला उडवण्यात आलं आणि फरपटत नेलं गेलं त्यामुळे तिचा मृत्यू झाला. असभ्यता आणि क्रूरतेचे टोक गाठणारे कृत्य भाजपाच्याच एका पदाधिकाऱ्याने केले. दिल्ली तल्या कंझावाल भागात जे घडलं ते भयंकर होतं. अंजली स्कुटीवर चालली होती. तिला कारने धडक दिली. त्यात तिचा पाय या कारमध्ये अडकला, तिला १२ किमी फरफटत नेण्यात आलं. या घटनेत तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही कार चालवणारा भाजपाचा पदाधिकारी होता. दिल्लीतल्या भयंकर घटनेने संपूर्ण देश हादरला. दिल्लीत जेव्हा निर्भया प्रकरण घडला होतं तेव्हा भाजपाने संसद चालू दिली नाही. आता अंजली प्रकरणात भाजपा शांत आहे. मुंबईत उर्फी जावेदच्या तोकड्या कपड्यांवरून संस्कृती रक्षणाचे धडे देणाऱ्यांनी अंजलीचा आक्रोश ऐकलाच नाही. अनसा अनेक अंजलींनी गेल्या सात वर्षात तडफडून प्राण सोडले."

Sanjay Raut
Sanjay Raut: शरद पवारांनी शिवसेना फोडली? सुनावणीच्या आधी संजय राऊत यांचा हल्लाबोल, राहुल गांधीचे केले कौतुक

अमृता फडणवीसांनी देखील उर्फीची बाजू घेतली

" उर्फीवरून एवढं सगळं सुरू असताना तिच्या बाजूने अमृता फडणवीस उभ्या राहिल्या. ती एक स्त्री आहे ती जे काही करते आहे त्यात वागवं काही नाही असं अमृता फडणवीस म्हणाल्या. थोडक्यात काय कपड्यांत काय आहे? व्यावसायिक गरजेनुसार प्रत्येकजण पोशाख आणि पेहराव करत असतो असं अमृता फडणवीस म्हणाल्या. मात्र संस्कृतीच्या नावाखाली भाजपाच्या सांस्कृतिक रक्षक संघटना येऊ लागल्या आहेत. मात्र त्यांच्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्याने अंजली सिंहला चिरडून मारलं यावर कुणी ब्र काढायला तयार नाही. हे आक्रित नाही का?" असा सवाल राऊतांनी केला आहे.

Sanjay Raut
Urfi Javed Controversy: ...त्याच कपड्यांवर मी बाहेर पडते; उर्फी जावेदनं दीड तासाच्या चौकशीत बरंच काही सांगितलं

अभिनेत्री दीपिकावर देखील भाजप नेते आक्रमक झालेले दिसले. यावर संजय राऊतांनी म्हटले की, " शाहरुख खानच्या पठाण सिनेमातील गाण्यात दीपिका पदुकोणने भगवी बिकिनी घातली आणि रोमान्स केला. हे सगळं संस्कृती विरोधी असल्याचं ठरवून भाजपा आणि इतर संघटनांनी पठाणवर बंदी घालण्याची बहिष्कार मोहीम सुरू केली. हा राग दीपिकाच्या भगव्या बिकिनीवर होता की अन्य कशावर? दीपिकाने जेएनयूमध्ये जाऊन तिथल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. त्याच रागातून हे भगव्या बिकिनीचं प्रकरण उभं करण्यात आलं असाही आरोप रोखठोकमध्ये करण्यात आला आहे."

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com