बीड : शिंदे-फडणवीस सरकार (Eknath Shinde) हे शेतकऱ्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. मात्र प्रशासन आणि सरकार याकडे गांभीर्याने पाहत नाही. त्यामुळे सरकारने आता तरी या शेतकऱ्यांना (Farmer) सरसकट दिवाळीपूर्वी मदत करावी. अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिला आहे. बीडच्या परळी तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी दौऱ्यानंतर माध्यमांशी बोलत होते.
आज परळी तालुक्यात अचानक वाढलेल्या अतिवृष्टीमुळे, शेतकऱ्यांचा प्रचंड नुकसान झालंय. अनेक पुल वाहून गेलेत आणि याचीच पाहणी करण्यासाठी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे थेट शेताच्या बांधावर पोहोचले. यावेळी त्यांनी तहसीलदार यांना झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे तात्काळ सरकारला सादर व्हावेत. तसेच घरात पाणी शिरून ज्यांचे धान्य, किराणा, भांडे आदी संसार उपयोगी वस्तूंचे नुकसान झाले आहे, अशा कुटुंबांना आकस्मिक निधीतून 6 हजारांची मदत करण्याची कार्यवाही 24 तासांच्या आत करावी, अशा सूचना केल्या.
ते पुढे बोलतांना म्हणाले, की मागील 15 दिवसात बीड जिल्ह्यात दररोज एक शेतकरी आत्महत्या होत आहे. यावर नियंत्रण मिळवण्यात सरकारला अपयश आले आहे. मागील दोनवेळा मदतीची घोषणा केली तेव्हा बीड जिल्ह्याला त्यातून वगळले आहे. पण आता जे नुकसान पावसाने केले आहे, ते बघूनतरी या सरकारला पाझर फुटेल का ? असा संतप्त सवाल देखील धनंजय मुंडे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना केला.
काल बीड जिल्ह्यात 4 जणांचा अतिवृष्टी मुळे मृत्यू झाला. आजही परळी तालुक्यातील गाडे पिंपळगाव येथील एक तरुण पुरात वाहून मयत झाला आहे. मात्र सरकारने अद्याप या घटनांची दखलही घेतल्याचे दिसत नाही. ऐन दिवाळीत शेतकऱ्यांच्या नशिबी आलेल्या या गंभीर परिस्थितीत सरकारने तातडीने मदत न केल्यास, रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा धनंजय मुंडे यांनी राज्य सरकारला दिला.
Edited By - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.