सागर निकवाडे
नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा गावाजवळ तापी आणि गोमाई नद्यांचा संगम आहे. याच ठिकाणी नद्यांमध्ये रासायनिक केमिकल युक्त हिरवे पाणी सोडण्यात आले आहे. गेल्या चार दिवसांपासून प्रकाशा येथील गोमाई नदीमध्ये हिरव्या रंगाचे केमिकल युक्त पाणी येत असल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. इतकेच नाही तर या पाण्यामुळे माशांचा देखील मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा हे तीर्थक्षेत्र आहे. याठिकाणी तापी नदीत स्नान करण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येत असतात. तर याच ठिकाणी तापी नदीला गोमाई नदी देखील मिळालेली आहे. मात्र मागील तीन- चार दिवसांपासून नदीत केमिकल युक्त पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे गोमाई नदीचे पाणी पूर्णपणे हिरवे झाले असून, काठावरही हिरव्या रंगाचा थर साचलेला आहे.
मासे आढळले मृतावस्थेत
दरम्यान हिरव्या रंगाचा केमिकल युक्त पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. तर नदी पात्रात सोडलेल्या केमिकल युक्त पाण्यामुळे मासे मृताअवस्थेत आढळले आहेत. या रासायनिक पाण्यामुळे मासे मोठ्या प्रमाणात मरत असल्याचे मच्छीमारांचे म्हणणे असून जे नदीतील जीवसृष्टीसाठी अत्यंत हानिकारक आहे. तर प्रशासनाने या गंभीर घटनेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांचा आहे.
प्रकाशा गावाला होतो पाणीपुरवठा
प्रकाशा गावातील पाणीपुरवठा गोमाई नदीतूनच होतो. त्यामुळे दूषित पाण्याचा थेट परिणाम गावातील पिण्याच्या पाण्यावर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हिरव्या रंगाचा या पाण्यामुळे पाणी पिण्यायोग्य राहिलेले नाही. यामुळे त्वचेचे आजार किंवा इतर आरोग्य समस्या उद्भवण्याची शक्यता देखील निर्माण झाली आहे. यात आता श्रावण महिना सुरू होणार असल्याने तापी नदीत लाखो भाविक स्नानासाठी येतात. गोमाई नदीचे पाणी पुढे तापीला मिळत असल्याने या दूषित पाण्यामुळे त्यांना रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.