सागर निकवाडे, प्रतिनिधी
मध्य प्रदेशात (Madhya Pradesh Rain) गेल्या काही दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवला आहे. मध्यप्रदेशातील सततच्या पावसाने नर्मदा नदीला मोठा पूर आहे. या पुराचा फटका नंदुरबार जिल्ह्याला बसला असून नर्मदा काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नर्मदा नदीचे (Narmada River) पाणी गावात शिरल्याने धडगांव तालुक्यातील सावऱ्यादीगर, भमाणा, खापरमाळ, उडदया बादल, बाबरी गावातील नागरिकांना मोठी अडचण निर्माण झाली आहे. धडगाव तालुक्याला जोडणाऱ्या सावऱ्यादिगर पुलांचे काम अर्धवट असल्याने नागरिकांचे हाल होत असल्याचे चित्र आहे.
शासनाकडून सदर पुलासाठी वाढीव निधीची तरतूद करण्यात आली असली तरी पुलाच्या कामाला सुरवात झाली नाही. तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने नदी नाले भरून वाहत असून नर्मदा नदीत पाणी भरल्याने बॅकवॉटर पूर्ण भरले आहे.
नदी ओलांडण्यासाठी शासनाकडून बाजची सुविधा उपलब्ध करण्यात आली असली तरी मागील दोन ते तीन दिवसांपासून नादुरुस्त असल्याने बंद आहे. त्यामुळे नदी ओलांडण्यासाठी नागरिकांसह शासकीय कर्मचाऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. मात्र प्रशासनाचे पूर्णपणे याकडे दुर्लक्ष झाले आहे. तात्काळ बाज दुरुस्ती करण्याची मागणी गावकरी करत आहे. (Latest Marathi News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.