अभिजित देशमुख
मोदी स्वतः घाबरल्यासारखे दिसतात. त्यांनी जे काल भाषण केलं आणि शरद पवारांना भटकती आत्मा म्हटलं. महाराष्ट्रात इतक्या खालच्या दर्जाचं भाषण आजपर्यंत कुणाचंही झालं नव्हतं, अशा शब्दांत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी काल महाराष्ट्रात पुणे दौऱ्यावर होते. रेसकोर्स येथे त्यांची जाहीर सभा देखील पार पडली. या सभेत उपस्थितांना संबोधित करताना मोदींनी विरोधकांवर टीका करताना भटकती आत्मा असा उल्लेख केला. त्यांच्या या टीकेचा रोख शरद पवारांकडे होता असं म्हटलं जात आहे. त्यावरून आता राष्ट्रावादी शरद पवार गट चांगलाच आक्रमक झाला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी या टीकेवून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर भटकती आत्मा म्हणतात, ते उपरोधक असतं. या प्रकारचा प्रचार करणे म्हणजे त्यांना शरद पवारांचा मृत्यू अभिप्रेत आहे.
एकीकडे अजित पवार म्हणतात शरद पवारांची शेवटची सभा कधी होणार आणि दुसरीकडे मोदी म्हणतात भटकत्या आत्माने महाराष्ट्राचं वाटोळं केलंय. त्यामुळे या भटकत्या आत्म्याची ताकद काय आहे? हे त्यांना आता कळेल, असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.
मोदींच्या सभेबाबत बोलताना आव्हाड म्हणाले की, सभा सगळ्यांच्याच होत असतात. शरद पवारांची सभा देखील १७ तारखेला होणार आहे, असं जितेंद्र आव्हाडांनी यावेळी सांगितलं. त्यामुळे आता १७ तारखेला शरद पवार मोदींच्या टीकेला काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
काय म्हणाले होते मोदी?
महाराष्ट्रात ४५ वर्षांपूर्वी एका भटकत्या आत्मेने हा खेळ सुरू केला. तेव्हापासून त्यांचा राज्यात अस्थिरता आणण्याचा प्रयत्न आहे. आता त्या व्यक्तीकडून देशात अस्थिरता पसरवण्याचा प्रयत्न होत आहे. ही आत्मा आपल्या पक्षासह कुटुंबातील व्यक्तींना देखील सोडत नाही. १९९५ मध्ये भाजप आणि शिवसेनेची सत्ता आली होती. तेव्हा देखील हिच आत्मा सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत होती, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं होतं.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.