जळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने रेल्वे सेवा सुरळीत झाली. आरक्षणासह इतर प्रवाशांना देखील प्रवासाची परवानगी मिळाली. मुळात जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्गाचा आलेख खुपच खाली आला असताना देखील नियमित अपडाउन करणाऱ्यांना अर्थात पासधारकांना रेल्वेत परवानगी दिलेली नाही. (jalgaon-news-after-coronavirus-railway-reguler-pass-traveling-no-parmission)
राज्यात तसेच अन्य जिल्ह्यात संसर्ग साखळी खंडीत झाल्याने दक्षिण मध्य रेल्वेच्या काही गाड्यांमध्ये सर्वसाधारण प्रवाशांना प्रवासाची सवलत आहे. तर उत्तर रेल्वेने देखील मासिक पासधारकांना प्रवासाची सवलत दिली आहे. सद्यस्थितीत विशेषतः जळगाव जिल्ह्यात संसर्ग साखळी खंडीत होवून सुमारे ३३ टक्क्यांच्यावर नागरिकांपैकी अनेकांचे दोनही टप्प्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यात हजारो शासकिय खाजगी वा अन्य संस्थांमधील नोकरदार, व्यावसायिक समावेश आहे. परंतु या पॅसेजर वा अन्य रेल्वेसेवा सुरू करण्यासंदर्भात पालकमंत्र्यांसह अन्य लोकप्रतिनिधींकडून कोणतीही हालचाल दृष्टिक्षेपात नसल्याने भुसावळ- देवळाली वा मुंबई, धुळे- चाळीसगावसह अन्य पॅसेंजरसह हुतात्मा, अन्य मेल-एक्सप्रेस सुरू झालेल्या नसल्याने पॅसेंजर गाड्यांचे भवितव्य अधांतरीच आहे.
त्यांचा होतोय नाईलाज
कोरोना प्रादूर्भावामुळे २४ मार्च २०२० पासून सर्वच रेल्वे सेवा बंद होत्या. त्या काही प्रमाणात जूनपासून ते सद्यस्थितीत कोविड स्पेशलसह अन्य लांब पल्ल्याच्या विशेष गाड्यांव्दारे आरक्षीत तिकीटे घेउनच प्रवास सवलत आहे. संसर्गाच्या नावाखाली अगोदरच बहुतांश ठिकाणी अनेकांचे रोजगार गेले असून काहींचे पगार निम्मेवर आले आहेत. तरीही नाशिक ते भुसावळ दरम्यान हजारो नोकरदार, व्यावसायिक, कामगार मासिक पास सवलत नसल्याने नाईलाजास्तव खाजगी वाहन वा बसेसव्दारे ये- जा करीत आहेत.
बस गर्दीने भरून जाताय
संसर्गाच्या नावावर पॅसेंजर मेल एक्सप्रेसमधून सर्वसाधारण व मासिक पाससेवा बंद आहे. परंतु दुसरीकडे महामंडळाच्या बसेस भरभरून प्रवासी वाहतूक करीत आहेत. केवळ संसर्ग काळातील तूट भरून काढण्यासाठीच या बसेस चालविल्या जात असून या दरम्यान कोरोना संसर्ग होत नाही का? असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. लसीचे दोन डोस पूर्ण झालेल्यांना तरी मासिक पासव्दारे मेल-एक्सप्रेसमधून व पॅसेंजर गाड्या सुरू करून प्रवासाची सवलत द्यावी अशी मागणी नियमित प्रवाशांमधून केली जात आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे
संसर्ग लॉकडाउननंतर पॅसेंजरऐवजी डेमू, मेमू सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून सद्यस्थितीत भुसावळ लोकोशेडमध्ये डेमू, मेमू उभ्या आहेत. परंतु राज्य शासनाची परवानगी नसल्याने या गाड्या धूळखात उभ्या आहेत. तर कर्मचारी देखिल अन्यत्र सेवांमध्ये वळते करण्यात आले आहेत. त्यामुळे रेल्वेचा करोडो रूपयांचा महसूल बुडीत होत आहे. गाड्या सुरू करण्याविषयी लोकप्रतिनिधी केवळ आश्वासने देतात. परंतु स्थानिक पातळीवर संसर्ग परिस्थिती पहाता जिल्हाधिकारी या गाड्यांना थांबे देण्याविषयी वा नाकारण्याविषयी आदेश देवू शकतात. नाशिक वा जळगावचे जिल्हाधिकारी यांनी अनुकुलता दर्शविल्यास राज्य शासन परवानगीने पॅसेजरऐवजी डेमू मेमू सेवा सुरू करता येतील.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.