भंडारा: नवरदेवाची मागणी पूर्ण झाली नाही म्हणून नवरदेव लग्न मंडपी पोहचलाच नाही हि घटना भंडारा जिल्ह्यातील लाखनी शहरात घडली आहे. तर नावरदेववर हुंडा बंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखनी शहरात हुंड्यासाठी लग्न मोडल्याची घटना उघडकीस आली आहे. रितीरिवाजा प्रमाणे लग्न जुळले, घरात लग्नाची तयारी सुरू झाली. साक्षगंधाचाही कार्यक्रम आटोपला. पत्रिकाही छापल्या, हॉलचे बुकिंगही करण्यात आले. मात्र लग्नाचा दिवस जवळ आला, वर पक्षाकडून हुंड्यासाठी निरोप आला. वेळेवर मागणी पूर्ण करणे शक्य नसल्याचा निरोप वधूपित्याने धाडला. हुंडा नाही तर लग्न नाही असे म्हणत नवरदेव मंडपात पोहोचलाच नाही.
राजेंद्र वामनराव शिंदे, रा. केळकरवाडी, जि. वर्धा असे हुंड्यासाठी रुसलेल्या नवरदेवाचे नाव असून लाखनी येथील दिव्या (काल्पनिक नाव) या मुलीचा विवाह राजेंद्र शिंदे याच्या सोबत ठरला होता. लग्नाची तयारी सुरू झाली. 15 ऑगस्ट रोजी साक्षगंधाचा कार्यक्रमही झाला. 16 सप्टेंबर रोजी लग्नाचा मुहूर्त ठरला असताना नवरदेवांनी वधूचा वडिलांना दोन तोळ्याचा सोन्याचा गोफ आणि वर्हाडी साठी बसची मागणी केली. वेळेवर कसे शक्य असे म्हणत वधू पित्यानी मागणी फेटाळली मग काय, नवरदेव रुसला व मंडपी पोहोचलाच नाही.
लग्नाची संपूर्ण तयारी झाली आचारी, डेकोरेशन, हॉल, मेहंदी वाले, सगळे बुक झाले, मात्र वेळेवर नवरदेव रुसल्याने वधू पक्षाकडील मंडळींना मोठा धक्काच बसला. अखेर वधूच्या पित्याने लाखनी पोलीस स्टेशन मध्ये नवरदेवाविरुद्ध तक्रार दिली असुन शिंदे यांच्या परिवारावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. लाखनी पोलिसांनी प्रकरणाचा गांभीर्य लक्षात घेत नावरदेवाविरुद्ध हुंडाबंदी अधिनियम 1961 कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
Edited By: Pravin Dhamale
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.