
आवडत्या मुलाबरोबर लग्नास नकार दिल्याच्या रागातून अल्पवयीन मुलीने वडिलांविरोधात बलात्काराचा खोटा आरोप दाखल केला होता. अमरावती सत्र न्यायालयाने वडिलांना या प्रकरणात दहा वर्षांची शिक्षा सुनावली होती. वडिलांनी या शिक्षेविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अपील दाखल केले. न्यायमूर्ती गोविंद सानप यांच्या खंडपीठाने याप्रकरणी सुनावणी घेत महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली. न्यायालयाने पुराव्यांचा आढावा घेत वडिलांना दोषमुक्त केले, तसेच खोट्या आरोपांमुळे वडिलांचे जीवन उद्ध्वस्त झाल्याची नोंद घेतली. न्यायालयाने असे प्रकरण स्त्री-पुरुष समानतेच्या तत्त्वाला तडा देणारे असल्याचे म्हटले आणि अशा गंभीर आरोपांवर सत्य पडताळणीच्या आधारेच निर्णय घेण्याचे निर्देश दिले.
अमरावतीतील शिरखेड परिसरात 14 वर्षीय मुलीने वडिलांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. तक्रार दाखल करताना 14 वर्षीय मुलगी नवव्या वर्गात शिकत होती. तिची आई सात वर्षांपूर्वी घर सोडून गेली आणि दुसरा विवाह केला होता, वडील मुलीचे संगोपन करत होते. तक्रारीनुसार, मुलगी तिसरीमध्ये शिकत असताना वडिलांनी पहिल्यांदा तिच्यावर बलात्कार केला. यानंतर वडील सातत्याने तिच्यावर बलात्कार करत राहिले. वडिलांनी जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे मुलीने याबाबत अनेक वर्ष कुणालाही माहिती दिली नाही. मात्र नवव्या वर्गात शिकत असताना तिने अखेर तिच्या आजीकडे मागील अनेक वर्षांपासून होणाऱ्या लैंगिक शोषणाबाबत माहिती दिली. यानंतर वडिलांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अमरावतीच्या सत्र न्यायालयाने पोक्सो कायद्याखाली वडिलांना १० वर्षांची शिक्षा ठोठावली होती, परंतु त्यांनी उच्च न्यायालयात या शिक्षेविरोधात अपील दाखल केले. आरोपीने मुलीचे आरोप फेटाळून लावत सांगितले की, मुलीला जवळच्या नात्यातील एका मुलाशी लग्न करायचे होते, ज्याला वडिलांनी विरोध केला. यामुळे मुलीने खोटा बलात्काराचा गुन्हा दाखल केल्याचा दावा वकिलांनी केला. उच्च न्यायालयाने या दाव्यात तथ्य असल्याचे मान्य करून वडिलांची निर्दोष मुक्तता केली. या खटल्यात पीडित मुलीच्यावतीने ॲड. ए.डी. टोटे यांनी बाजू मांडली, तर पोलिसांच्यावतीने ॲड. सोनिया ठाकूर यांनी युक्तिवाद केला. न्यायालयाने तपास आणि परिस्थिती विचारात घेऊन वडिलांना दोषमुक्त करण्याचा निर्णय दिला.
उच्च न्यायालयाने वडिलांवर दाखल झालेल्या खटल्याचा आढावा घेताना महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले की, मुलीच्या लग्नाला वडिलांनी केलेला विरोधच खोट्या तक्रारीमागील मुख्य कारण ठरला. वडिलांचे मुलाला अपात्र ठरवण्याचे निरीक्षण योग्य असल्याचे कोर्टाने मान्य केले. मुलगा आणि मुलीमध्ये आधीच शारीरिक संबंध प्रस्थापित झाले होते, ज्यामुळे वडिलांनी योग्य निर्णय घेतला. तसेच, मुलीने आजीच्या प्रभावाखाली येऊन वडिलांवर खोटी तक्रार दाखल केली असल्याचे कोर्टाने म्हटले. या निरीक्षणांनंतर, न्यायालयाने वडिलांची तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले. न्यायालयाने स्पष्ट केले की पालक म्हणून मुलीसाठी योग्य जोडीदार निवडण्याचा अधिकार वडिलांचा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.