तरबेज शेख
नाशिक: कांदा प्रश्न हा आमच्यासाठी राजकीय नाहीये. या प्रश्नाकडे आम्ही जिव्हाळ्याचा विषय म्हणून पाहत असून त्यावर कायमस्वरुपाचा मार्ग काढत असल्याचं प्रतिपादन भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांनी केलंय. विरोधकांनी ६० वर्षात कांद्याप्रश्नी काय काम केलं? काँग्रेसच्या काळात निर्यातबंदी का झाली? असा सवालदेखील डॉ. पवार यांनी केलाय. कांदा प्रश्नावरून भारती पवार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही टीका केलीय.
नाशिक आणि दिंडोरी येथील उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पिंपळगाव येथे सभा घेणार आहेत. दिंडोरीमधून खुद्द डॉ. भारती पवार ह्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान आज होणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या सभेलाला नागरिकांनी मोठी गर्दी केलीय. मात्र मोदींच्या सभेआधी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. राज्यातील शेतकरी कांदा निर्यात बंदीवरून केंद्र सरकारवर नाराज आहेत. निर्यातबंदीवरून विरोधकांनीही केंद्र सरकारवर घणाघाती टीका केलीय. यावरून भाजप उमेदवार यांनी विरोधकांना उत्तर दिलंय. विरोधकांनी कांदा प्रश्नावरती काय काम केले का? त्यांनी एक पत्र तरी लिहिलं का? असा सवाल विरोधकांना करत त्यांना उत्तर दिलंय.
कांदा निर्यातबंदीवरून राज्यातील शेतकऱ्यांमध्ये रोष आहे. त्यावरून बोलताना पवार म्हणाल्या की, कांदा प्रश्नावर मीदेखील वेळोवेळी मागणी केलीय. मंत्रिमंडळातील मंत्र्यांना भेटून मी वेळोवेळी कांदा प्रश्नावर मार्ग काढलेत आणि शेतकऱ्यांना मदत केलीय. त्यामुळे जनतेला हे माहितीये. जे काम मी केलंय ते जनतेसमोर आहे. कांदा अनुदान देण्याचा प्रश्न असेल त्याप्रकरणी राज्य सरकारने मदत केलीय.
गारपीट होऊन जेव्हा कांदा उत्पादकांचे नुकसान होते, त्यासाठी नुकसान भरपाई देणं हेही प्रश्न आम्ही मार्गी लावलेत. भविष्यात कांद्याबाबत शाश्वतपणे मार्ग निघावा, यासाठी सरकार काम करत आहे. कांदा आणि द्राक्षे निर्यात व्हावी, यासाठी ड्रायपोर्ट मंजूर झालाय, हेही पहिल्यांदा होतंय. इतकं सारं काम झाल्याने कांदा उत्पादकांचा सरकारविषयी विश्वास वाढलाय. तेच विरोधकांच्या पोटात दुखत आहे, म्हणून ते कांद्यावर बोलत आहेत.
परंतु विरोधक मात्र गेल्या ६० वर्षात कांदा उत्पादकाविषयी घेतलेला निर्णय सांगत नाहीत. तसेच विरोधक त्यावर पर्याय सुद्धा सांगत नाहीत. त्यांच्या काळात का निर्यात बंदी झाली याचेही ते उत्तर देत नाहीत. राहुल गांधी पार्लमेंटमध्ये शेतकऱ्यांच्या विरोधात बोलण्यासाठी उभे राहतात. कांदा प्रश्नावर खासदारांना घेऊन बाहेर जातात, आंदोलन करतात.
कोरोना काळात शेतमाल घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांचे वाहने जागोजागी अडवणअयात आल्या. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनीही शेतकऱ्यांच्या गाड्या अडवल्या. त्यावेळी विरोधकांनी राग, आक्रोश व्यक्त केला नाही.मात्र केंद्र सरकारने तेथील राज्य सरकारशी बोलून त्या गाड्या सोडवल्या.त्यामुळे कांद्याच्या मुद्द्याकडे आम्ही राजकीय मुद्दा म्हणून आम्ही बघत नाही तर हा आमचा जिव्हाळ्याचा प्रश्न यावर कामस्वरुपी मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही करत असल्याचं भारती पवार यांनी सांगितलं.
लाखो लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऐकण्यासाठी येत आहे. ज्यावेळी पंतप्रधान मोदींची सभा पिंपळगाव येथे होणार असल्याचं निश्चित झालं त्यावेळेपासून जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत.मोदी हे मनातील पंतप्रधान असल्यानेच लोक सभेला गर्दी करत आहेत. मोदी असे पहिले पंतप्रधान आहेत जे राम मंदिरात गेले रामतीर्थावर गेलेत.आतापर्तंत कोणताच पंतप्रधान राम मंदिरात गेले नाहीत. आमच्या देवाचा आमच्या देशाचा सन्मान आमचे पंतप्रधान करतात. मोदी सरकार काम करत असल्याने लोकांचा विश्वास त्यांच्यावर असल्याचं पवार यावेळी म्हणाल्या.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.