बालाजी सुरवसे
धाराशिव : राज्यात बर्ड फ्लूचा प्रसार अजूनही पूर्णपणे थांबलेला नाही. कारण धाराशिवमधील ढोकी पाठोपाठ आता कळंबमध्ये देखील कावळ्यांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे कावळ्यांचा मृत्यू हा बर्ड फ्ल्यूमुळे झाल्याचा संशय आहे. या अनुषंगाने मृत कावळ्यांचे नमुने घेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. अहवाल आल्यानंतर कावळ्यांच्या मृत्यूचे कारण समोर येईल.
धाराशिव जिल्ह्यातील ढोकी गावात बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव झाल्याचे समोर आले होते. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात परिसरात २७ कावळे मृतावस्थेत आढळले होते. बर्ड फ्ल्यू विषाणूची लागण झाल्याने मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर परिसरात कोंबड्यांना देखील बर्ड फ्ल्यू झाल्याचे समोर आल्याने प्रशासन सतर्क झाले होते. त्या अनुषंगाने उपाययोजना करत बर्ड फ्ल्यू नियंत्रणात आणण्यात आला होता. मात्र आता पुन्हा बर्ड फ्ल्यूने डोके वर काढले आहे.
कळंबमध्ये कावळ्यांचा मृत्यू
ढोकी गावातील बर्ड फ्ल्यू नियंत्रणात आल्यानंतर आता कळंब शहरात बर्ड फ्ल्यूचा फैलाव झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. कळंब गावातील स्मशानभूमी परिसरात कावळ्यांचा मृत्यू झाल्याची बाब स्थानिकांकडून निदर्शनास आली. सदरचा प्रकार प्रशासनाला कळविल्यानंतर एक टीम याठिकाणी दाखल झाली असून परिसरात सर्व्हेक्षण करण्यास सुरवात केली आहे.
मृत कावळ्यांचे नमुने तपासणीसाठी रवाना
दरम्यान कळंब गावात मृत कावळे आढळल्याने आता कळंब गावात देखील बर्ड फ्लूची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान गावात दाखल झालेल्या पशुसंवर्धन विभागाच्या टीमने मृत कावळ्यांचे नमुने घेतले आहे. हे नमुने भोपाळ येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कावळ्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.