चंद्रपूर - जिल्ह्यातील कोळसा खाणीतून उच्चप्रतीचा कोळसा काढला जातो. मात्र, या कोळशाची मोठी हेराफेरी होत असून, कोल माफियांकडून उच्चप्रतीच्या कोळशाची लुट होत आहे. कोळशाच्या हेराफेरीची सीबीआय (CBI) चौकशी करण्याची मागणी काँग्रेस (Congress) नेते तथा माजी खासदार नरेश पुगलिया (Naresh Pungliya) यांनी केली आहे. चंद्रपुरात कोलमाफिया सक्रिय झाले असून, या कोलमाफियांना राजकीय पाठबळ मिळत आहे.
कोलमाफियांमुळे शासनाला कोट्यवधींचा चूना लागत असल्याचा आरोप पुगलिया यांनी केला आहे. महाराष्ट्राला कोळसा उत्पादनातून एकट्या चंद्रपूर जिल्ह्याने ४९२.७४ कोटी मायनिंग रायल्टी दिली आहे. तर चुनखडी उत्खननातून ८४.८० कोटी रायल्टी मिळाली आहे. मात्र, जिल्ह्यात कोळशाची मोठ्या प्रमाणात हेराफेरी होते. कोलमाफियांकडून दादागिरी आणि गुंडगिरीच्या जोरावर रोज कोळशाची हेराफेरी केली जात आहे.
हे देखील पहा -
बहुतांश माफियांना राजकीय नेत्याचे पाठबळ असल्याने वेकोलि प्रशासन कारवाईसाठी पुढे येत नसल्याचा आरोपही पुगलिया यांनी केला. उच्चप्रतीचा कोळसा खासगी व्यापाऱ्यांना तर निकृष्ट प्रतीचा माती आणि चुरीमिश्रीत कोळसा शासकीय संस्था व उद्योगांना पुरविण्यात येत असल्याने शासनाचे कोट्यवधींचे नुकसान होत आहे. कोळशाच्या हेराफेरीचे एक प्रकरण १८ जानेवारी रोजी चंद्रपुरात पुढे आले.
कोळशाच्या चुरीचे परमिट असताना उच्च प्रतीचा कोळसा भरून नेणारे 3 ट्रक काही युवकांनी पकडले. यानंतर वेकोलि अधिकारी, शहर पोलीस ठाणे यांना माहिती देण्यात आली. मात्र कारवाई न करता ट्रक सोडले गेले. कोलमाफियांचे आणि वेकोलि अधिकाऱ्यांचे संगनमत असून, शासनाचे कोट्यवधी रुपयांचे यात नुकसान होत असल्याचा आरोप करीत या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी नरेश पुगलियांनी केली आहे.
Edited By - Shivani Tichkule
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.