Akola Crime News : अल्पभूधारक शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना अकोला (Akola) जिल्ह्यातील आगर येथून जवळच असलेल्या खेकडी येथे घडली आहे. तुकाराम मोतीराम बुध असे मृतक शेतकऱ्याचं नाव आहे. या शेतकऱ्याच्या आत्महत्येने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
अकोला जिल्ह्यात सध्या शेतकरी आत्महत्येच्या प्रकरणामध्ये वाढ झाल्याचे दिसून येत असून यावर चिंता व्यक्त करण्याची आवश्यकता आहे. तुकाराम मोतीराम बुध यांच्याकडे दोन एकर शेत असून मोर्णानदी परिसरात ही शेती आहे. त्यांनी या जमिनीत या वर्षी खरीप पेरणीसाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा आगर येथे कर्ज घेऊन लागवड केली. पण जुलैच्या पहिल्या आठवड्यात मोर्णा नदीला आलेल्या पुरात कपाशीची बियाणे अंकूर अवस्थेत असतानाच सुपीक माती व पीक वाहून गेले. त्यामुळे त्यांनी पुन्हा दुबार पेरणी करून मशागत केली. परंतु गेल्या दोन महिन्यांत संततधार पावसामुळे वेळेवेळी मोर्णा नदीला पूर सुरुच असल्याने पिकांची वाढ चांगली होत नसल्याचे पाहून ते चिंताग्रस्त झाले होते.
या नैराश्यातून खचून जाऊन त्यांनी गावा शेजारीच असलेल्या काटेरी झाडाच्या फांदीला गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. या संदर्भात मुलगा संतोष बुध यांनी उरळ पोलीस स्टेशनमध्ये माहिती दिली. ठाणेदार अनंतराव वडतकार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तुकाराम बुध यांच्या पश्चात एक मुलगा, चार मुली, सुन, नातवंडे असा परिवार आहे. दरम्यान, खेकडी या गावात स्मशानभूमी असून या गावातून स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता हा कच्चा आहे. त्यामुळं पावसाळ्याच्या दिवसांत येथे जायला पायवाट नाही. रस्ता कच्चा असल्यामुळे या मार्गावर प्रचंड चिखल असतो. कुणाला ये-जा करता येत नाही. त्यामुळे गावाच्या रस्त्यावरच आत्महत्या केलेल्या तुकाराम बुध या शेतकऱ्याचे अंत्यसंस्कार करण्यात आले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.