
Ahmednagar News: आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. संभाजीनगर आणि धाराशीवच्या नामांतरानंतर आता मुख्यमंत्र्यांनी अहमदनगरचं नाव अहिल्यानगर करण्याचा निर्णय घेतला आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून अहमदनगरचं नामांतर 'अहिल्यादेवीनगर' करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलीये.
औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशीव नामांतर केल्यानंतर शिंदे फडणवीस सरकारने अहमदनगरच्या नामांतरची घोषणा केलीये. जामखेडच्या चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. याच कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी अहमदनगरच्या नामांतराची घोषणा केली आहे.
पडळकरांनी विधान परिषदेत विचारला होता सवाल?
आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधिमंडळात यासंदर्भात मागणी करताना सरकारची यासंदर्भात काय भूमिका आहे असा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मंत्री दीपक केसरकर यांनी सरकार या नामांतराबाबत सकारात्मक असून यासंदर्भात स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रस्ताव देखील मागवले आहेत अशी माहिती दिली होती. यासंदर्भात शासन स्तरावर हालचाली सुरु असून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मनपाकडून ठरावाची प्रत देखील मागवली असल्याची माहिती दिली होती.
अहमदनगरची स्थापना आणि इतिहास
15व्या शतकाच्या अखेरीस निजामशाहा मलिक अहमद बहिरी याने बिदरचा सेनापती जहांगीर खानचा याचा पराभव केला. आताच्या अहमदनगरजवळील भिंगार येथे जिंकलेल्या युद्धाचा आनंद साजरा करताना मलिक अहमदने भुईकोट किल्ला उभारण्याचा आणि त्याच्याजवळ शहर वसवण्याचा निर्णय घेतला. 28 मे 1490 रोजी मलिक अहमदने येथे शहराची स्थापना केली आणि त्याला अहमदनगर असे नाव दिले. यंदा अहमदनगर शहराच्या स्थापनेला 533 वर्ष पूर्ण झाली आहेत. अहमदनगर हे नाव मलिक अहमद याच्या नाववरूनच पडले आहे. (Latest Political News)
आहिल्याबाई होळकर यांचे नाव का?
अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725 रोजी अहमदनगरच्या जामखेड तालुक्यातील चौंडी या छोट्या गावात झाला होता. अहिल्याबाई या भारतातील माळव्याच्या जहागीरदार असलेल्या होळकर घराण्याच्या 'तत्त्वज्ञानी राणी' होत्या. मल्हारराव होळकर यांनी त्यांना प्रशासकीय आणि सैन्याच्या कामाचे प्रशिक्षण दिले होते. त्याच्या जोरावर अहिल्याबाईंनी इ.स. 1766 ते 1795 या काळात माळव्यावर राज्य केले. अहिल्याबाई होळकर यांच्या इतिहास लक्षात राहावा आणि त्यांच्या शौर्याची जाणीव लोकांमध्ये कायम राहावी यासाठी अहमदनगरचे नाव त्यांच्या नावावरून ठेवावे अशी मागणी केली जात आहे. (Latest Marathi News)
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.